Jitendra Awhad Sarkarnama
ठाणे

Jitendra Awhad Politics : माडगुळकरांच्या गीतरामायणात रामाचा उल्लेख...

सरकारनामा ब्यूरो

पंकज रोडेकर :

Thane News : वादग्रस्त विधान करून रोष ओढवून घेणे, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आणि आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना नवीन नाही. बुधवारी (३ जानेवारी) शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विशेष अधिवेशनात त्यांनी प्रभू श्री राम हे मांसाहार करत होते, असे विधान करून वाद ओढावून घेतला होता. त्यामुळे आव्हाड विरुद्ध शिवसेना शिंदे गट, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप असा सामना पाहायला मिळाला. या सामन्यात आव्हाडांची खिंडीत कोंडी करण्याचा कसून प्रयत्न सुरू आहे. मात्र, आव्हाडांनीच वाल्मीकी रामायणाचा हवाला दिला आणि वादाला जवळपास पूर्णविराम मिळाला.

दुसरीकडे सोशल मीडियावर आव्हाड समर्थकांनी प्रभू श्रीराम मांसाहारी होते याचे पुरावे देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रभू श्री राम नेमके मासांहारी होत की शाकाहारी होते, या नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

आक्रमक नेता असलेले आव्हाड अभ्यासपूर्वक विधाने करून वाद अंगावर ओढून घेतात. किंबहुना त्यांना हे चांगले जमते. यापूर्वी आव्हाडविरोधकांची संख्या कमी होती. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याने त्यांच्या विरोधकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातच त्यांचे कट्टर समजलेले जाणारे समर्थकही त्यांना सोडून गेले आहेत. आव्हाडांविरोधात शिंदे गटाने दंड थोपटल्याने त्यांना प्रत्येकी वेळी कोंडीत पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो. मग, ते मुंब्रा येथील विनयभंग प्रकरण असो किंवा विकासकामाच्या श्रेयाचे राजकारण असो. या शिवाय भाजपकडून करमुसे मारहाणप्रकरणी त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

दीड ते दोन वर्षांत जितेंद्र आव्हाडांची खिंडीत कोंडी करून पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता तर त्यांचा आणखी विरोधक तयार झाला आहे. तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट. या गटानेही आव्हाडांना त्यांच्या मतदारसंघात उभे आव्हान निर्माण करत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नवीन वर्षाच्या सुरवातीला आव्हाडांनी प्रभू श्रीराम मांसाहार करत होते, असे विधान करून त्यांच्या विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिले आहे. त्या विधानानंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. पण, हे वाल्मीकी रामायणात असल्याचे सांगून तसेच त्यावर खेद व्यक्त करून आव्हाडांनी त्यांच्याकडून विषय संपवला. त्यानंतर आव्हाड समर्थकांनी प्रभू श्रीराम हे मांसाहार करत असल्याचे पुरावे सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली आहे.

ग. दि. माडगूळकर लिखित आणि सुधीर फडके यांच्या आवाजातील गीतरामायणातही मांसाहारीचा उल्लेख दाखवून दिला आहे. तसेच अयोध्याकांड, अध्याय 52, श्लोक 102 आणि एका चित्रफितीतही भूक लागलेल्या राम-लक्ष्मणाने, एक रानडुक्कर, एक हरीण व एक काळवीट मारले व त्याच्या मांसाचे सेवन केले, असे म्हटले आहे. अशाप्रकारे आव्हाड समर्थकांनी श्रीराम हे मांसाहार करत असल्याचे पुरावे देत, आव्हाडांच्या वक्तव्यात किती तथ्य आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे श्रीराम हे मांसाहारी आणि शाहाकारी हा लोकसभा निवडणूकाचा प्रमुख मुद्दा राहिल्यास आश्चर्य वाटू नये.

वाल्मीकी रामायणातील हा पुरावा...

अयोध्या कांड, अध्याय 52, श्लोक 102

तौ तत्र हत्वा चतुरो महामृगान्

वराहमृश्यं पृषतं महारुरुम्।

आदाय मेध्यं त्वरितं बुभुक्षितौ

वासाय काले ययतुर्वनस्पतिम्।।

अर्थ:

तिथे पोहोचल्यावर भूक लागलेल्या राम - लक्ष्मणाने, एक रान डुक्कर, एक हरीण व एक काळवीट मारले व त्याच्या मांसाचे सेवन केले, त्यानंतर त्यांनी एका झाडाखाली निद्रा घेतली.

- वाल्मिकी रामायण

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT