Raju Patil, Sanjay Raut
Raju Patil, Sanjay Raut sarkarnama
ठाणे

सुपारीबाजांची सुपारी फुटली नसल्यानेच दुःख झाले...राजू पाटलांची राऊतांवर टीका

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : राज ठाकरे यांचा अयोध्य दौरा स्थगित केल्यानंतर पुन्हा एकदा राजकारण सुरू झाले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी आम्ही त्यांना सहकार्य केले असते, असा टोला लगावला होता. त्यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी श्री. राऊत यांना प्रतिउत्तर देत अप्रत्यक्षरीत्या त्यांना सुपारीबाज म्हणत 'यांची सुपारी फुटली नसल्याचे दुःख झाल्यानेच ते असे बोलत असतील. आम्ही काय करायचं, कसं जायचं हे त्यांनी सांगायची आम्हाला गरज नाही' अशा शब्दात राऊतांवर टीका केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा येत्या पाच जूनला अयोध्या दौरा होणार होता. तुर्तास अयोध्या दौरा स्थगित असे ट्विट राज यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्र सैनिकांनो यावर लवकरच बोलू असे सांगत त्यांनी याविषयी बोलणार असल्याची भूमिका देखील स्पष्ट केली आहे. राज यांच्या या भूमिकेवरुन आता राजकारण रंगू लागले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाने राज यांच्यासोबत चुकीचं केल असे म्हणत भाजपवर टीका केली. आदित्य यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा अयोध्या दौरा होणार आहे. इतर पक्षांचे कार्यक्रम तेथे होणार होते, पण ते रद्द झाल्याचे माध्यमांतून समजते. शेवटी ती अयोध्या असून शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग तेथे आहे. भाजपकडून आपल्याला वापरले जात आहे हे काही लोकांना उशीरा कळत. काही लोकांना यातून शहाणपण आले तर बरं होईल असा, अप्रत्यक्ष टोला त्यांनी मनसे अध्यक्ष राज यांना लगावला.

यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना उत्तर देऊ केले आहे. आमदार पाटील यांनी राऊत यांचे नाव न घेता त्यांना सुपारीबाज म्हटले आहे. काही लोकांना राजकारणाच्या सुपाऱ्या दिल्या जात असल्याची चर्चा आहे. यांची सुपारी फुटली नसेल याचे दुःख त्यांना होत असावे असा प्रतिटोला आमदार पाटलांनी राऊतांना लगावला आहे. ''मुळात दौरा रद्द नाही तर स्थगित करत पुढे ढकलण्यात आला आहे.

आम्ही कसे जायचे काय करायचे हे आम्हाला तुम्ही सांगायची गरज नाही, तुम्ही तुमचे पहा. त्यांना दुःख वाटलं असेल कदाचित त्याची सुपारी फुटली नसेल. काही लोकांना राजकारणाच्या सुपाऱ्या दिल्या असल्याची चर्चा आहे. ते राजकीय हित साध्य झालं नसेल म्हणून ते अस बोलत असावे असे आमदार पाटील म्हणाले. राज यांच्या तब्येतीच्या कारणास्तव हा दौरा स्थगित केला गेला आहे. याविषयी ते आपली भूमिका देखील स्पष्ट करणार आहेत असेही आमदार पाटील म्हणाले.

लोंढे घेऊन जायची गरज काय....

काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी आम्ही आयोध्येला दर्शनासाठी जाणार आहोत, दौऱ्यासाठी नाही असं विधान केलं होतं. यावर आमदार पाटील म्हणाले, त्यांच्या नावातच लोंढे आहे. लोंढे घेऊन जायची गरज नसल्याने ते एकटे जाऊ शकतात. त्यांनी कस जायचं, कस नाही जायचं हा त्यांचा विषय आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT