Sharad Pawar
Sharad Pawar sarkarnama
ब्लॉग

पवारांच्या आपुलकीने कार्यकर्ता भारावला; विमानाने पोहचवले घरी

सरकारनामा ब्यूरो

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटण्यासाठी अनेक कार्यकर्ते राज्यभरातून येत असतात. त्यांना भेटून त्यांचे समाधान शरद पवार यांच्याकडून केले जाते. पवारांकडे गेलेला कार्यकर्ता त्यांचाच होऊन जातो. तसाच काहीसा अनुभव डॉ. भरत चव्हाण (Bharat Chavan) यांना आला. त्या संदर्भात आपल्या भावना चव्हाण यांनी एका फेसबुक (Facebook) पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

फेसबुक पोस्टमध्ये चव्हाण म्हणाले, राजकारणाची कोणतीही पार्श्वभुमी नसलेल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुणाला शरद पवार साहेब जेव्हा विमानातुन स्वत:सोबत औरंगाबादला घेऊन जातात. हल्ली राजकारणात आपण पाहतो की राजकीय नेते जेंव्हा सर्वसामान्य लोकांना ऐकून घेयला व भेटायला ही कंटाळा करतात. त्यांच्या समस्या तर बाजूलाच राहिल्या पण भेटण्याच्याही सीमा ठरवतात. तेव्हा एका सर्वसामान्य घरातून येणारा माझ्यासारखा तरुण म्हणून जेव्हा माझ्या काही अडचणी व प्रश्न पवारसाहेबांना भेटून त्यांच्या कानावर घालावे, म्हणून त्यांना भेटण्यासाठी मी शनिवारी रात्री औरंगाबाद वरून बारामती गाठली.

बारामतीचे नितीन यादव यांच्या मदतीने तिथे पोहचल्यावर थांबण्याची व्यवस्था झाली व साहेबांची भेटीचीही वेळही मिळाली. अंघोळ वगैरे करून सकाळी गोविंदबाग येथे साहेबांना भेटण्यासाठी उपस्थित राहिलो. साहेबांना भेटायला अनेक बाहेरगावावरून व स्थानिक पदाधिकारी मातब्बर नेते आले होते. मला साहेबांना भेटण्यासाठी आवाज देण्यात आला, आत गेल्याबरोबर रात्रभर प्रवास करून थकलेला चेहरा पाहून साहेबांनी विचारलं कुठून आलात?

मी औरंगाबादहुन असे उत्तर दिले मग साहेबांनी अडचणी काय आहेत, वगैरे विचारल्या समजून घेतल्या मला खरंच खूप नवल वाटत होते. इतक्या उंचीचा नेता इतक्या आपुलकीने मी कुठला कोण पण माझे सर्व प्रश्न ऐकुण घेत होते, माझे पूर्ण बोलणे झाल्यावर साहेब स्मितहास्य करीत म्हणाले ठीक आहे, बघतो मी काळजी करू नका! मी धन्यवाद साहेब म्हणत बाहेर पडणार तोच साहेबांनी पुन्हा आवाज दिला अन विचारले औरंगाबादवरून आला आहात ना परत कधी जाणार आहात?

मी म्हटले साहेब आता निघेल! साहेब बोलले थांबा मी पण आज औरंगाबादलाच जातो आहे. तुम्हाला हरकत नसेल तर चला माझ्यासोबत! हे शब्द ऐकुण मी स्वप्नात तर नाही ना असे मला राहुन राहुन वाटत होते. तितक्यात साहेबांनीच पुन्हा मला सांगितले सोबतच जाऊयात. मग बाहेर सतीश राउत यांना फोनवरुन मला सोबत घेण्याचे निर्देश दिले. त्यांच्याकडे गेल्यावर तेही बोलले साहेबांचा निरोप आहे, थांबा निघुयात आपण!

एका छोट्या मोठ्या पदावरुनही हवेत जाणारे व सर्वसामान्य लोकांना कुठलीच किंमत न देणारे नेते पुढारी अनेकदा अनुभवले. पण याचीच दुसरी बाजु सामान्य लोकांना आपले समजून आपलेसे करणारे पवारसाहेब माझ्या प्रत्यक्ष नजरेतून आभाळाएवढया मोठ्या मनाचे आणि त्याहीपेक्षा जास्त उंचीचे प्रेमळ नेते आहेत इतकेच सांगू शकतो.

माझ्यासारख्या एका तरुणासोबत शेती, राजकारण, समाजकारण, माझे कुटुंबातील लोक या व असंख्य विषयावर साहेबांनी विमानात त्यांच्या शेजारच्या सीटवर सोबत बसवुन चर्चा केली. म्हणुन तर साहेबांसोबत विमान प्रवास करताना अनेकदा डोळे भरुन येत होते. अन राहुन-राहुन वाटत होते, यामुळेच का काय, पवारसाहेब सर्वांचेच 'साहेब' आहेत. खूप खूप धन्यवाद आदरणीय पवारसाहेब! शेवटी, आषाढी एकादिवशी मला माणसाच्यातल्या 'विठ्ठलाचे' दर्शन झाल्याची भावना मनात आयुष्यभर निरंतर राहिल!, अशा आपल्या भावना चव्हाण यांनी व्यक्त केल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT