Sanyukta Maharashtra Movement
Sanyukta Maharashtra Movement Sarkarnama
ब्लॉग

Sarkarnama Podcast: संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि शाहिरांचं योगदान

सरकारनामा ब्यूरो

Sarkarnama Podcast : १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली…पण ही निर्मिती सहज झाली नव्हती…त्यामागं मोठा लढा होता…. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' हा अट्टाहास पूर्ण करण्यासाठी १०७ हुतात्म्यांनी महाराष्ट्राच्या भविष्यासाठी इतिहास रचला. (Sanyukta Maharashtra Movement and Shahir's contribution)

स्वंतत्र भारतानंतर भाषांवर आधारित भारतातील प्रांतांची रचना करण्यात आली. याच काळात मराठी भाषिक महाराष्ट्रासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने बीज पेरले. 1954 रोजी मध्ये फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची पूर्ण करण्यात आली. परंतु या अहवालात महाराष्ट्राला दुजाभाव देण्यात आला. त्याचबरोबर मुंबईला महाराष्ट्रापासून तोडल्याची भावना जोर धरली होती. त्यामुळे या असंतोषाच्या भावनेचा उद्रेक होऊन महाराष्ट्रात या आयोगाविरोधात बंड पेटलं.

पुढं महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली खरी…पण डांग बेळगाव, निपाणी, कारवार आणि बिदर हे प्रांत मात्र महाराष्ट्रापासून वेगळे झाले….त्याची सल आजही आहे…या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत हुतात्त्म्यांचं जसं मोठं योगदान होतं…तसंच साहित्यिक आणि शाहिरांचही होतं…आज जाणून घेऊयात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाविषयी…

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश मिळवण्यात कोटी-कोटी मराठी जनतेला दीर्घकाळ लढा द्यावा लागला. या उग्र आंदोलनाने दिल्लीचं तख्तही हादरलं आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मराठी जनता, लेखणी आणि वाणीने लढणारे नेते आणि उभा महाराष्ट्र जागा करणारे शाहीर, हे या आंदोलनाचे नायक होते. विशेषतः शाहिरांचे योगदान हा तर या चळवळीतील अमूल्य व अविस्मरणीय घटक होता.

घरादारावर निखारे ठेवून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शाहीर तन-मन-धनाने उतरले. शाहीर अमर शेख, अण्णा भाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर साबळे, पिराजीराव सरनाईक, आत्माराम पाटील, किती नावे घ्यावीत? या शाहिरांनी डफावर थाप देत उभा आडवा महाराष्ट्र पिंजून काढला. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन त्यांनी गावागावांत घराघरांत पोहोचविले. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ऐन भरात होती. पोलिसांच्या अत्याचाराला न जुमानता लोक कलापथकाच्या कार्यक्रमांना हजर रहात होते. मोरारजी सरकारनं जेव्हा तमाशावर बंदी घातली तेव्हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणाले होते. मायबाप सरकारनं तमाशावर बंदी आणली म्हणून आज आम्ही माझी मुंबई हे लोकनाट्य आपल्यासमोर सादर करत आहोत.

मुंबई कुणाची या लोकनाट्यात वर्णन केलेला सीमाभाग महाराष्ट्राला दुरावणार ही व्यथाही त्यांचं काळीज पोखरत होती....त्यातूनच जन्माला आली एक अप्रतिम लावणी....माझी मेला गावाला राहीली...माझ्या जीवाची होतीया काहीली... (Political Short Videos)

शाहीर अमर शेख म्हणजे तर मुलूखमैदानी तोफच....त्यांच्या पहाडी स्वरांनी मराठी जनता या लढ्यात खेचली गेली. नाशिकचे डाॅ. सुधीर फडके यांनी लिहिलेले गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती हे गीत अमर शेखांमुळं लोकप्रियतेच्या शिखरावर त्या काळी पोचलं होतं.

शाहीर साबळे यांची आंदोनल काळातली आठवण या संदर्भात बोलकी आहे. मुंबई आकाशवाणीवर त्यांना एकदा पोवाडा सादर करण्यास बोलावले होते, त्यांच्या पत्नी भानुमती यांनी लिहिलेला तो पोवाडा होता, 'महाराष्ट्र भूमी बहुगुणी, शोभती खमी किती नरमणी जन्मले हिच्या कुसव्यास...' पोवाड्याची सुरवात वाचली अन् तत्कालीन केंद्र संचालक म्हणाले, 'शाहीर, तेवढा महाराष्ट्र शब्द वगळा!' तरीही थेट प्रसरणावेळी शाहिरांनी तोच पोवाडा, तसाच्या तसा सादर केला. लगेच केंद्र संचालकांनी दिल्लीला कळविले, आमच्या सौजन्याचा शाहिरांनी गैरफायदा घेतला आणि पुढे शाहीर साबळेंचे आकाशवाणीवरील कार्यक्रमच बंद झाले.

हीच लोकनाट्ये मग अन्य शाहिरांनी गावागावांत नेली. संयुक्त महाराष्ट्र झाल्याशिवाय लग्न करणार नाही, अशी प्रतिज्ञा करून ती प्रत्यक्षात आणणारे गजाभाऊ बेणींसारखे अनेक शाहीर यात आहेत. या कलापथकांनी ठिकठिकाणी मोर्चे काढले व संयुक्त महाराष्ट्राचे रणशिंग फुंकले. शाहीर शंकरराव निकम, शाहीर अनंतराव मुठे, बी. मेघराज, प्रताप परदेशी, गजाभाऊ बेणी, शाहीर करीम शेख, भिका पाटील, रतन जाधव, हरिभाऊ खैरनार, शाहीर सूर्यवंशी अशा कित्येक शाहिरांनी जिल्ह्याजिल्ह्यांत जागल्याचं काम त्यावेळी केलं होतं. (Political Web Stories)

ज्या शाहीर साबळेंचा उल्लेख वर झाला त्यांनीची लिहिलेलं महाराष्ट्र गीत आता महाराष्ट्र राज्याचं गीत म्हणून मान्यता पावलंय....आजही हे गीत ऐकताना अंगावर काटा उभा रहातो....चला तर ऐकूया हे महाराष्ट्राचे गीत.. (Political Breaking News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT