Amarinder Singh and Gandhi Family
Amarinder Singh and Gandhi Family  File Photo
ताज्या बातम्या

कॅप्टन उगवणार सूड! काँग्रेसच्या हातातून सत्ताही काढून घेणार?

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री (Chief Minister) अमरिंदरसिंग हे काँग्रेसचे (Congress) सरकार पाडू शकतात, ही दाट शक्यता समोर येत आहे. पंजाबमध्ये विश्वासदर्शक ठराव मांडण्याची प्रस्ताव समोर आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. कॅप्टन यांच्या समर्थक आमदारांनी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. खुद्द कॅप्टन यांनीच आज याबाबत संकेत दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपद काढून घेण्याचा सूड कॅप्टन काँग्रेसचे सरकार घालवून घेतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

कॅप्टन यांनी आज काँग्रेसला उघडउघड इशारा दिला आहे. विधानसभेत पक्षाने बहुमत गमावल्यास विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय घ्यावा लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. पंजाब विधानसभेचे एकूण संख्याबळ 117 आहे. विश्वासदर्शक प्रस्ताव मांडण्यात आला तर बहुमत सिद्ध करण्यासाठी 59 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेसने 2017 च्या विधानसभा निवडणुकीत 77 जागा जिंकल्या आहेत. नंतरही काही आमदार पक्षात आले होते. परंतु, सध्याचा विचार करता पक्षात तीन गट पडले आहेत. अमरिंदरसिंग यांचा एक गट, नवज्योतसिंग सिद्धू यांचा दुसरा गट आणि मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचा तिसरा गट असे तीन गट आहेत. हे तिन्ही नेते आपल्याकडे संख्याबळ असल्याचा दावा करीत आहेत. परंतु, एकाही नेत्याकडे 59 आमदार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

कॅप्टन यांची भाजपशी जवळीक वाढली आहे. विश्वासदर्शक प्रस्तावावेळी ते काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपचा पुरेपूर वापर करून घेतील. कॅप्टन हे समर्थक आमदारांना आपल्या बाजूला खेचतील. याचसोबत कुंपणावर असलेले आमदार भाजपच्या मदतीने आपल्या बाजूला वळवून घेतील. यामुळे कॅप्टन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीचे नेमके कारण समोर येऊ लागले आहे. केंद्र सरकारचा वापर करून राज्यात कॅप्टन हे खेळी करण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कॅप्टन यांनी काल (ता.29) दिल्लीत अमित शहांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोघांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली होती. नंतर कॅप्टन शहांच्या निवासस्थानातून बाहेर पडले होते. लवकरच कॅप्टन भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाईल, अशीही चर्चा सुरू आहे. कृषी मंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाईल, असेही बोलले जात आहे.

कॅप्टन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पुढील वाटचालीचे संकेत दिले आहेत. त्यांनी काँग्रेस अथवा भाजपसोबत जाण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले की, सध्या मी काँग्रेसमध्ये आहे. मला योग्य वागणूक देण्यात आली नाही. मी काँग्रेस सोडणार आहे पण भाजपमध्ये जाणार नाही. माझ्यावर विश्वासच नसेल अशा पक्षात मी का राहावे? आतापर्यंत पक्षाने माझा खूप अपमान केला आहे. यापुढे मी अपमान सहन करणार नाही. सोनिया गांधींनी सांगितले म्हणून मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता पुढील निर्णय मी घेणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT