Sambit Patra File Photo
ताज्या बातम्या

नंदिग्रामची पुनरावृत्तीच भवानीपूरमध्ये होणार! संबित पात्रांची भविष्यवाणी

सरकारनामा ब्युरो

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) तीन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका होत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या भवानीपूर (Bhawanipur) मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. भाजपने (BJP) ममतांच्या विरोधात प्रियांका टिबरेवाल (Pryinaka Tibrewal) यांना उभे केले आहे. त्यांच्या प्रचारासाठी भाजप नेते संबित पात्रा (Sambit Patra) मैदानात उतरले असून, त्यांना ममतांच्या पराभवाचे भाकित वर्तवले आहे.

भवानीपूर मतदारसंघात भाजपकडून जोरदार प्रचार सुरू आहे. या एकात मतदारसंघात भाजपने 3 खासदार आणि 8 आमदार कामाला लावले आहेत. आता संबित पात्रानींही प्रचारात उडी घेतली आहे. ते म्हणाले की, प्रियांका टिबरेवाल यांचा प्रचार मी करीत आहे, हे माझे भाग्यच आहे. येथे मंचावर सुवेंदू अधिकारी तुम्हाला गरजताना दिसत आहेत. नंदिग्राममध्ये अधिकारींना ममतांचा पराभव केला होता. आता भवानीपूरमध्ये त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे. ममता बॅनर्जी या नंदिग्राममध्ये म्हणत होत्या की त्यांचा पराभव होणार नाही. आता त्या भवानीपूरमध्येही हेच म्हणत आहेत. परंतु, अंतिम विजय हा सत्याचाच होतो.

भाजपच्या उमेदवार प्रियांका टिबरेवाल या 41 वर्षांच्या आहेत. त्या कोलकता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात. त्यांनी 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. खासदार बाबुल सुप्रिया यांच्या विधी सल्लागार म्हणून प्रियांका काम करीत होत्या. सुप्रियो यांनीच त्यांना सक्रिय राजकारणात आणून त्यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवला होता. तेव्हापासून त्यांची भाजपमधील वाटचाल वेगाने सुरू आहे.

प्रियांका टिबरेवाल या मागील विधानसभा निवडणुकीत एंटली मतदारसंघात भाजपच्या उमेदवार होत्या. त्यांचा त्यावेळी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार स्वर्णा कमल यांच्याकडून पराभव झाला होता. याचबरोबर कोलकता महापालिकेच्या 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत टिबरेवाल या तृणमूलच्या स्वपन सम्मादार यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या. नंतर 2020 मध्ये त्यांची भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बनवण्यात आले होते. भाजपला ममतांच्या विरोधात तगडा उमेदवार द्यायचा होता परंतु, अनेक नेत्यांना यास नकार दिला. डिपॉझिट जप्त होण्याच्या भीतीने बडे भाजप नेते ममतांच्या विरोधात मैदानात उतरण्यास तयार नाहीत. राज्यात तृणमूलच्या विजयानंतर झालेल्या हिंसाचारप्रकरणी कोलकता उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये टिबरेवाल यांचा समावेश आहे. याच याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने हिंसाचाराची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

पारंपरिक मतदारसंघ असलेल्या भवानीपूरला सोडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदिग्राममध्ये जाण्याचा निर्णय चांगलाच भोवला होता. राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यात यश आले खरे पण त्यांना तेथे पराभव पत्करावा लागला. आता त्यांना पुन्हा निवडणूक लढवून विजयी होत मुख्यमंत्रिपद टिकवावे लागणार आहे. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा भवानीपूरला पसंती दिली आहे. पण भाजपनंही ममतांचा पराभव करण्यासाठी कंबर कसली आहे. राज्य भाजपने सहा जणांची नावे केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली होती. यातील भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रियांका टिबरेवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT