BJP
BJP  File Photo
ताज्या बातम्या

भाजपमध्ये वाद पेटला; पक्षाच्या बैठकीला वसुंधरा राजेंसह दोन केंद्रीय मंत्र्यांची दांडी

सरकारनामा ब्युरो

जयपूर : राजस्थानमधील (Rajasthan) काँग्रेसचे (Congress) सरकार कोसळण्याची वाट पाहत असलेल्या भाजपमधील (BJP) अंतर्गत कलह आता टोकाला पोचला आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) आणि प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया (Satish Puniya) यांच्यातील वाद वाढत चालला आहे. यातच पक्षाच्या चिंतन बैठकीला राजे, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत (Gajendra Singh Shekahwat) आणि भूपेंद्र यादव (Bhupender Yadav) यांनी दांडी मारल्याने पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

भाजपचे दोन दिवसीय चिंतन शिबीर नुकतेच झाले. या बैठकीला पक्षाचे सरचिटणीस बी.एल. संतोष यांनी राज्यातील सर्व नेत्यांचे कान टोचले. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीतच निवडला जाईल, असे त्यांनी जाहीर केले. त्यांनी यातून गटबाजी करणाऱ्या नेत्यांचे कान टोचले परंतु, खुद्द बैठकीतील गटबाजीकडे दुर्लक्ष केले. कारण पक्षाचे तीन मोठ्या नेत्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव या तिघांचा यात समावेश होता.

यावर भाजपमधील काही नेते सारवासारव करीत आहेत. बैठकीला उपस्थित असणारे तिन्ही नेते दिल्लीत राहतात. ते कायम बी.एल.संतोष यांच्या संपर्कात असतात, त्यामुळे त्यांनी चिंतन शिबिराला येण्याची काय आवश्यकता, असा प्रश्नही भाजप नेते उपस्थित करीत आहेत. याचवेळी भाजपमधील इतर नेते या तीन नेत्यांच्या अनुपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत. चिंतन शिबिरासाठी काही तास या नेत्यांना काढता येत नाहीत का, असा प्रश्न नाराज नेते उपस्थित करीत आहेत. यामुळे भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये पोस्टरवॉर रंगले आहे. राज्यात सगळीकडे भाजपचे पोस्टर लावण्याची मोहीम सुरू होती. विशेष म्हणजे या पोस्टरमधून वसुंधरा राजे या गायब होत्या. या पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांच्यासह राज्यातील चार नेत्यांची छायाचित्रे होती. मात्र, यात राजेंचे छायाचित्र नसल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले होते. मागील 20 वर्षांत प्रथमच भाजपच्या पोस्टरमधून राजे गायब झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते.

विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप अडीच वर्षांचा कालावधी बाकी असताना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, यावरून भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राजस्थानमधील सत्ताधारी काँग्रेससह विरोधी पक्ष असलेल्या भाजपला अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागत आहे. वसुंधरा राजे यांच्या समर्थकांकडून त्यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यात वसुंधरा राजे यांच्याशिवाय मुख्यमंत्रिपदासाठी लायक कोणताही नेता नाही, त्याच एकमात्र सर्वश्रेष्ठ नेत्या आहेत, अशी वक्तव्ये त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहेत. त्यामुळं पक्षात दोन गट पडले आहेत. .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT