Abhijeet Dipke on TET: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून उद्या घेण्यात येणाऱ्या TET परीक्षेचा पेपर आज फुटला, त्यामुळं ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख आंदोलक अभिजीत दिपके यांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्यांचं आंदोलन सुरु आहे. मंत्र्यांची खुर्ची गेल्याशिवाय त्यांना अक्कल येणार नाही, देशातील परिस्थिती सुधारणार नाही, अशी टीईटीच्या परीक्षा रद्दवर त्यांनी भूमिका मांडली आहे.
अभिजित दिपकेंनी जंतरमंतरवर पत्रकार परिषद घेत म्हटलं की, आता महाराष्ट्रात टीईटीचा पेपर लीक झाला आहे. उद्या हा पेपर होता तो एक दिवस आधीच रद्द करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर भाजपचं सरकार जिथं आहे तिथं त्यांना एकही परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही, हे आता सर्वांना कळलं आहे. त्यामुळं यांचं डबल इंजिनच सरकार हे आता डबल लीकचं सरकार बनलं आहे. देशात नीट परीक्षा लीक होतेय तर महाराष्ट्रात टीईटी लीक होत आहे.
हे पहिल्यांदाच होत नाहीए तर २०१८ मध्ये आपण पाहिलं की, १८,००० विद्यार्थी जे क्वालिफाईड झाले त्यांपैकी ८,००० विद्यार्थ्यांची पुन्हा तपासणी झाली त्यात त्यांचं पुन्हा एकदा क्वालिफिकेशन चेक करण्यात आलं तेव्हा धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे हे ८,००० विद्यार्थी या परीक्षेत पात्रच ठरले नव्हते. यामध्ये पैसे देऊन या जागा भरण्यात आल्या होत्या. हे ओपन सिक्रेट असून सर्वांनाच माहिती आहे. पुण्यातील शिक्षकांनी हे वारंवार सांगितलं होतं, की टीईटीच्या परीक्षेत मोठा घोटाळा सुरु आहे. जिथं एक-दोन कोटी रुपयांत जागा विकल्या जात आहेत.
त्यामुळं मी महाराष्ट्रातल्या आणि देशातील तरुणांना आवाहन करतो की, भाजपच्या सरकारला तुमच्या भविष्याशी काहीही देणंघेणं नाही. तुमची परीक्षा कशी जात आहे, याच्याशी त्यांना काहीही देणंघेणं नाही. यांना फक्त एकाच गोष्टीची चिंता आहे की, कसा यांचा पक्ष फोडला जाईल, दुसऱ्या पक्षाचे खासदार कसे फोडले जातील आणि आपली ताकद वाढवली जाईल याचीच त्यांना चिंता आहे. एक दिवस आधी परीक्षा रद्द करण्यात आली, एक हजारांहून अधिक केंद्र होते परीक्षेसाठी त्यासाठी काही विद्यार्थी हे केंद्रावर पोहोचले देखील होते. काही जणांनी आधीच हॉटेलवर थांबून परीक्षा देण्यासाठी तयारी केली होती, त्यांच्या खर्चाच काय? हा खर्च कोण वसून करुन देणार? त्यामुळं हे तर निश्चित झालं आहे की, भाजपकडून या देशात एकही परीक्षा घेतली जाऊ शकत नाही. कारण हे स्वतः आडाणी लोक आहेत, यांनी आयुष्यात कधीही परीक्षा दिलेली नाही त्यामुळं हे स्वतः एकही परीक्षा धड घेऊ शकणार नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.