<div class="paragraphs"><p>Aditya Thackeray threat&nbsp;</p></div>

Aditya Thackeray threat 

 
Sarkarnama
देश

आदित्य ठाकरेंना कर्नाटकातून धमकी; सत्ताधाऱ्यांचे भाजपकडे बोट...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 'जयसिंह राजपूत' याला बंगळुरूमधून अटक केली आहे. राजपूतचे कर्नाटक कनेक्शन समोर आल्यानंतर महाविकास आघाडीने तिथल्या भाजप सरकारकडे बोट दाखवले. दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांच्या हत्याचे कनेक्शनही कर्नाटकमध्ये होते, आणि तेव्हापासून आतापर्यंत तिकडे भाजपचे सरकार आहे. यात कोणते कनेक्शन आहे, धमकी देणाऱ्यांच्या पाठिशी कोण आहे? याचा तपास होणे गरजेचा आहे, असे शिवसेना आमदार सुनिल प्रभू म्हणाले.

आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray threat) धमकी प्रकरण चांगलेच तापले होते. राजपूत (Jaysingh Rajput) याला सध्या मुंबईत आणले असून त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली. सोबतच राज्यातील नेते, आमदारांना येणाऱ्या धमक्यांबाबत राज्यस्तरावर एक SIT ची स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली. त्यामार्फत अशा सर्व प्रकरणांची चौकशी करण्यात येणार आहे.

मंत्री आदित्य ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. फोन लागत नसल्याने संशयिताने त्यांना मेसेजद्वारे धमकी दिली. यात ‘तूने सुशांत सिंह राजपूत को मारा, अगला नंबर तेरा है’ अशा प्रकारचा आशय होता. या धमकीनंतर आदित्य ठाकरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्या आधारे तपास करुन ही धमकी देणाऱ्या जयसिंग राजपूतला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सायबर सेलने बेंगळुरूमधून अटक केली.

संशयित जयसिंगने तो सुशांतसिंह राजपूत याचा फॅन असून सुशांतच्या मृत्यूमागे आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप केल्याचे दावा एका वृत्तवाहिनीने केला आहे. राजपूतचे कर्नाटक कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक तर्कवितर्क आपल्या मनात येऊ शकतात, दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांच्या हत्येचे कनेक्शनही कर्नाटकात होते. तेव्हापासून आतापर्यंत भाजपचे सरकार आहे. त्यामुळे धमकी देणाऱ्यांच्या पाठिशी कोण आहे याची माहिती घेणे गरजेचं असल्याचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) म्हणाले.

नवाब मलिक (Nawab Malik) यांनीही भाजपला लक्ष्य केले. ते म्हणाले, सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याच्या आडून अनेक नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. रिया चक्रवर्तीवर दबाव आणून तिला अडकवण्याचा प्रयत्न झाला. मुंबईत आत्महत्या झाली आणि त्याचा गुन्हा बिहारमध्ये नोंद झाला. त्याच्या तपासाला येणारे पोलिस अलिशान गाड्यांमधून फिरत होते. ती गाडी भाजपच्या निलोत्पल उत्पल या नेत्याच्या होत्या. उत्पल सोन्याचा स्मगलर आहे, असाही दावा त्यांनी केला.

नवाब मलिक यांनी ट्रेंड कायम ठेवण्यासाठी ३० लाख पुरवत असल्याचा आरोपही केला. ते म्हणाले, आतापर्यंत सुशांतसिंह राजपूत प्रकरण सोशल मीडियात ट्रेंडिंगला आहे. सोशल मीडियावर हा ट्रेंड ठेवण्साठी महिन्याला ३० लाख पुरवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच या सगळ्याच्या मागे कर्नाटक कनेक्शन आहे. एसआयटी नेमून सोशल मीडियावर बदनामीसारख्या विषयाचा तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. सनातनसारख्या संस्था या मागे असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT