Sharad Pawar - Uddhav Thackeray-mamata banerjee
Sharad Pawar - Uddhav Thackeray-mamata banerjee Sarkarnama
देश

१० मार्चनंतर देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी; महाराष्ट्र करणार नेतृत्व

सरकारनामा ब्युरो

मुंबई : १० मार्च रोजी ५ राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत. त्यानंतर देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार असून त्या घडामोडींचे नेतृत्व महाराष्ट्र करणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आक्रमक पत्रकार परिषदेवरील प्रतिक्रिया देताना ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ईडी लोकांना कसे घाबरवते याचे सविस्तर वर्णन केले आहे. तसेच भाजपच्या किरीट सोमय्या यांचाही त्यांनी पर्दाफाश केला आहे. येत्या काही दिवसांत ते या संबंधित सगळी कागदपत्र घेवून ईडीकडे जाणार आहेत आणि जर तिथे काही हालचाल केली नाही तर ते 'ईओडब्लू' कडे जातील.

नवाब मलिक पुढे म्हणाले, या केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराविरोधात आम्ही येत्या काळात एक ठोस भूमिका घेणार आहोत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष येत्या काळात बसून याबाबतची रणनिती तयार करणार आहोत. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. तसेच तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटणार आहेत. बिगर भाजप सगळे आता १० मार्च नंतर एकत्र येवून एक ठोस भूमिका घेवून जनतेसमोर जाणार असेही त्यांनी सांगितले. दुसऱ्या बाजूला माजी पंतप्रधान देवेगौडा यांनीही केसीआर यांच्याशी फोनवरुन विरोधी पक्षांच्या एकत्रिकरणाला पाठिंबा दिला आहे.

संजय राऊत यांनी काल मुंबईत शिवसेना भवनात आमदार-खासदारांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फोट करत भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी आम्हाला मदत करा; अन्यथा तुम्हाला टाईट करण्यात येईल, अशी धमकी भाजप नेत्यांनी दिल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. या वेळी राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, नील सोमय्या, मोहित कंबोज यांच्यासह माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आरोप केले आहेत.

देवेंद्र फडणविसांच्या काळातील पाच हजार कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब माझ्याकडे असल्याचा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला. ते म्हणाले, आधी EOW कडे तक्रार करणार आणि नंतर हे प्रकरण ईडीकडे जाणार आहे. तसेच PMC घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान यांच्यापासून १२ हजार कोटी रुपयांची जमीन मोहित कंबोजने १०० कोटी रुपयांत खरेदी केली आहे. त्याचबरोबर निकाॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कोणाची कंपनी आहे? ही सोमय्यांची कंपनी आहे. वाधवान याला ब्लॅकमेल करून सोमय्यांनी ८० ते १०० कोटी रुपयांची रोकड घेतली आणि याच वाधवानने वीस कोटी रुपये भाजपच्या अकौंटमध्ये गेले आहेत, असाही आरोप संजय राऊत यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT