Ajay mishra teni-amit shaha-sb shirodkar

 

Sarkarnama

देश

केंद्रीय मंत्र्याला अडचणीत आणलेल्या तपासात एका मराठी अधिकाऱ्याचा हात

सरकारनामा ब्युरो

दिल्ली : लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशेष तपास पथकाने शेतकऱ्यांना चिरडण्याचा कट पुर्वनियोजीत असल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. या अहवालानंतर आता अजय मिश्रा यांची गच्छंती निश्चित मानली जात आहे. पक्षाकडून आज त्यांना दिल्लीला बोलावून घेण्यात आले असून त्यांना राजीनामा देण्याचे आदेश असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आज रात्री किंवा उद्या सकाळ पर्यंत त्यांचा राजीनामा निश्चित मानला जात आहे.

अजय मिश्रा यांना अडचणीत आणण्यासाठी विशेष तपास पथकाचा अहवाल कारणीभूत ठरला आहे. याच घटनेचा तपास आणि अहवाल तयार करण्यात एका मराठी माणसाचा अत्यंत महत्वाचा सहभाग आहे. मूळच्या महाराष्ट्राच्या असलेल्या आयपीएस अधिकारी एस. बी. शिरोडकर (S. B. Shirodkar) यांचा समावेश न्यायालयाने विशेष तपास पथकात केला होता.

कोण आहेत एस. बी. शिरोडकर?

उत्तरप्रदेशमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी असलेले एस. बी. शिरोडकर (S. B. Shirodkar) हे मूळचे महाराष्ट्रातील. १९९३ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना उत्तरप्रदेश केडर मिळाले होते. सद्यस्थितीमध्ये ते मागच्या तीन वर्षांपासून गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. यापुर्वी त्यांनी स्थापना विभागाचे अतिरीक्त पोलिस महासंचालक म्हणून काम केले आहे. शिरोडकर यांनी वाराणसी, बाराबंकी, मथूरा अशा महत्वाच्या शहरामध्ये काम केले आहे.

तसेच केंद्रात प्रतिनियुक्तीवर असताना त्यांच्याकडे ७ वर्ष सीआयएसएफमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. शिरोडकर यांनी यापुर्वी बहुचर्चित २०१८ सालची बुंदेलशहर हिंसाचाराचाही तपास केला होता. यात त्यांनी पोलिसांच्या हलगर्जीपणावर बोट ठेवले होते. त्यामुळे ४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. तेव्हाही पोलिस असून पोलिसांवर ठपका ठेवण्याच्या शिरोडकर यांच्या धाडसाचे आणि पारदर्शी तपासाची चांगलीच चर्चा झाली होती. स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून शिरोडकर यांनी उत्तरप्रदेशमध्ये नाव कमावले आहे.

याशिवाय दिपेंदर सिंग आणि पद्मजा चौहान यांचाही या तपास पथकात समावेश आहे. दिपेंदर सिंग (Deepinder Singh) या मुळच्या पंजाबच्या असून २००४ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्या सध्या सहारनपूरच्या डीआयजी आहेत. तर १९९८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या पद्मजा चौहान (Padmaja Chauhan) या मूळच्या हैदराबादच्या आहेत. त्या सध्या उत्तरप्रदेश पोलिस बढती आणि भरती बोर्डाच्या पोलिस महानिरीक्षक आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने केली आहे विशेष पथकाची स्थापना :

लखीमपूर खीरीच्या प्रकरणावर राज्याबाहेरील उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत तपासावर देखरेख ठेवण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली होती. यानुसार पंजाब व हरयाना उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश राकेश कुमार जैन (Rakesh Kumar Jain) यांची निवड केली होती. ते या प्रकरणाच्या तपासावर दैनंदिन देखरेख ठेवून तपास पारदर्शक, निष्पक्ष आणि योग्य होईल, याची काळजी घेत आहेत. याचबरोबर या तपासासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकात वरील तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश सर्वोच्च न्यायालयाने केला होता.

या विषेश तपास पथकाने हा हिंसाचार पूर्वनियोजित कट असल्याचा निष्कर्ष काढला आहे. केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) यांच्यावर आता खुनाचे गुन्हे दाखल आहेत. आता हा कट असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. याबाबत एसआयटीने या प्रकरणाच्या सुनावणी असणाऱ्या न्यायाधीशांसमोर अहवाल सादर केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT