Narendra Modi and Himanta Biswa Sarma
Narendra Modi and Himanta Biswa Sarma Sarkarnama
देश

सोनिया अन् राहुल गांधी आमच्या राज्यात आल्यास? भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पंजाब (Punjab) दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीवरून मोठा गदारोळ सुरू आहे. मोदींनी या कारणावरून दौरा अर्धवट सोडला होता. आता काँग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये (BJP) आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. यावरुन भाजप नेते व आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी (Himanta Biswa Sarma) यांनी काँग्रेसला थेट इशारा दिला आहे.

पंजाबमध्ये मोदींच्या जिवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप भाजपने केला आहे. पंजाबमधील काँग्रेस सरकारने जाणीवपूर्वक मोदींच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी ठेवल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आला होता. काँग्रेसने मोदींच्या सभेला गर्दी नसल्यानेच त्यांनी दौरा रद्द करून परत जाणे पसंत केले, असे म्हटले आहे. यावर आता मुख्यमंत्री सरमा यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना इशारा दिला आहे.

सरमा यांनी म्हटले आहे की, मोदींच्या सुरक्षितेतला धोका निर्माण केल्याप्रकरणी काँग्रेस कारवाई करण्यास तयार नाही. एकप्रकारे काँग्रेस अशा प्रकारांना मान्यता देण्याची भूमिका घेत आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे आसाममध्ये आल्यानंतर आम्ही असेच केल्यास? हे स्वीकारार्ह असेल का? ते जर आसाममध्ये आल्यास आम्ही जशास तशी भूमिका घेणार नाही.

फिरोझपूरमध्ये पंतप्रधानांकडून 5 डिसेंबरला विविध प्रकल्पांचे उदघाटन केले जाणार होते. दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम नियोजित होता. त्यासाठी भाजपने जय्यत तयारीही केली होती. त्याआधी पंतप्रधान मोदी हुसेनवाला येथील राष्ट्रीय हुतात्मा स्मारक येथे हेलिकॉप्टरने जाणार होते. पण पावसाळी वातावरणामुळे त्यांनी रस्त्याने जाण्याचा निर्णय़ घेतला. भटिंडा येथून हा मार्ग दोन तासांचा होता.

पंजाब पोलिस महासंचालकांनी सुरक्षा व्यवस्थेची खात्री केल्यानंतर पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा हुसेनवालाच्या दिशेने निघाला होता. हुतात्मा स्मारकापासून 30 किलोमीटर अंतरावरील एका पुलावर वाहनांचा ताफा आल्यानंतर काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे लक्षात आले. त्यामुळे पंतप्रधानांना सुमारे 20 मिनिटे तिथेच थांबावे लागेल. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही मोठी त्रुटी होती, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान मोदींचे वेळापत्रक आणि प्रवासाचे नियोजन पंजाब सरकारला आधीच कळवले होते. त्यानुसार राज्य सरकारने सुरक्षा व इतर बाबींची योग्य खबरदारी घेणे आवश्यक होते. सरकारने रस्त्यावरील इतर गोष्टी थांबवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरवणे अपेक्षित होते. पण तसे करण्यात आले नाही. सुरक्षा व्यवस्थेतील या त्रुटींमुळे पंतप्रधानांनी पुन्हा भटिंडा विमानतळाकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT