Telangana  sarkarnama
देश

Assembly Elections Results : देशाचे दक्षिणायन भाजपसाठी दूरच ... 

Prasad Shivaji Joshi

Telangana Elections Results : देशाचा साऊथ पोल म्हणजेच दक्षिणेतील राज्यात भाजपला अजूनही अपेक्षित यश गाठता आलेले नाही. २०१८ च्या तुलनेत भाजपने प्रगती केली असली तरी अजूनही अपेक्षित यश मिळाले नसल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे. तसेच शहरी भागात मतदानाची टक्केवारी कमी असल्यामुळे भाजपला फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

भाजपने घेतली होती विशेष मेहनत

भारतीय जनता पक्षाला संपूर्ण देशभरात अनुकूल वातावरण असले तरी दक्षिणेकडील राज्यात मात्र अजूनही अपेक्षित यश मिळालेले नाही. दक्षिणेतील कर्नाटक राज्याचा अपवाद वगळता इतर तेलंगणा, तामिळनाडू, केरळ या राज्यात भारतीय जनता पक्षाला दोन आकडी संख्या गाठण्याचेच उद्दिष्ट साध्य करताना प्रचंड मेहनत घ्यावी लागत आहे.

तेलंगणात यश मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने विशेष मेहनत घेतली होती. विधायक प्रवास योजेनेतून महाराष्ट्रातील आमदारांना तेलंगणातील विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. याचा थोडाफार परिणाम दिसून येत असला केंद्रीय नेतृत्वाला अपेक्षित असलेले निकाल लागलेले नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जायंट किलर बंडी संजय कुमार यांना हटवले

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने प्रदेशाध्यक्ष बंडी संजयकुमार यांना हटवले. त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत महासचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र, राज्यातील सूत्रे त्यांच्याकडून काढून घेण्यासाठीच हे प्रमोशन असल्याचे मानले जाते. बंडी संजयकुमार संघ परिवार आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित कार्यकर्ते आहेत.

२०१९ मध्ये त्यांनी करीमनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. तेलंगणा राष्ट्र समितीचे खासदार के. बी. विनोद कुमार यांचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव केला. या निकालाने त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

भारतीय जनता पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत संपर्क असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र, पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने अचानक निर्णय घेत बंडी संजयकुमार यांना हटवून जी किशन रेड्डी यांच्या नियुक्ती केली. यामुळेसुद्धा पक्षाला फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.

मतदानाची टक्केवारी जास्त असली, की त्याचा फायदा भाजपला होतो व कमी मतदान झाले तर त्याचा फटकाही बसतो हे समीकरण तेलंगणा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रत्ययास आले आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत शहरी भागातील मतदारांनी फारसा उत्साह दाखवला नाही.

विशेषतः हैदराबाद परिसरात मतदानाची टक्केवारी अतिशय कमी होती. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये यश मिळवून देणाऱ्या मतदारांनी विधानसभा निवडणुकीत मतदान न केल्यामुळे पक्षाला फटका बसल्याचे मानले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT