Ayodhya Ram Mandir Donation Scam : अयोध्येतील राम मंदिरातील देणगी व्यवस्थापनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारा धक्कादायक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. देणगी मोजणी प्रक्रियेशी संबंधित आठ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. या आरोपींकडून तब्बल 80 लाख रुपयांची रोकड आणि काही परकीय चलन जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणामुळे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्यावरील दबाव वाढताना दिसत आहे. काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी या प्रकरणावरून थेट आक्रमक भूमिका घेत चंपत राय यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे राजकीय वातावरण तापले असून, प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
या संपूर्ण प्रकरणात देणगी मोजणी विभागाचा प्रमुख सुभाष श्रीवास्तव याचाही आरोपींमध्ये (Crime) समावेश असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ट्रस्टच्या तीन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीवरूनच त्याची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, मुख्य आरोपी रामेश्वर उर्फ टिन्नू यादव हा चंपत राय यांच्या वाहनाचा चालक होता. मंदिरातील अनेक दानपेट्यांच्या चाव्या त्याच्याकडे असल्याने संशय आणखी गडद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर परिसरात विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या देणगीपेट्यांमधील रोख रक्कम कथितरीत्या अपहार करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या दानपेट्यांच्या चाव्या टिन्नू यादवकडे होत्या, त्यामधील रकमेवर डल्ला मारण्यात आल्याचा संशय आहे. यामध्ये नेमकी कोणती यंत्रणा वापरली गेली, याचा तपास यंत्रणा सध्या शोध घेत आहेत.
याचदरम्यान, देणगी अपहार प्रकरणानंतर चंपत राय आणि ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी राजीनामे सादर केल्याची माहिती समोर आली आहे. ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी यांनी या राजीनाम्यांवर पुढील बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. ट्रस्टकडून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. अलीकडील घडामोडींमुळे ट्रस्टला मोठा धक्का बसला असून भाविकांचा डळमळीत झालेला विश्वास पुन्हा प्रस्थापित करणे ही आमची प्राथमिक जबाबदारी असल्याचे ट्रस्टने म्हटले आहे.
दरम्यान, राम मंदिरात देणगी व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेली ‘आदर्श कार्यपद्धती’ प्रत्यक्षात फक्त कागदावरच असल्याचेही समोर आले आहे. नियमांनुसार देणगी मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांना खिसा नसलेले कपडे परिधान करणे बंधनकारक होते. तसेच सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, आत-बाहेर जाताना कर्मचाऱ्यांची तपासणी, अचानक झडती आणि सीसीटीव्ही फुटेज 180 दिवस जतन करणे आवश्यक होते.
मात्र धक्कादायक बाब म्हणजे, सीसीटीव्ही फुटेज केवळ 45 दिवसच जतन करण्यात येत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे मंदिरातील सुरक्षाव्यवस्थेवर आणि ट्रस्टच्या प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. राम मंदिर हे देशातील कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र मानले जाते. अशा ठिकाणी देणगी अपहारासारखा गंभीर प्रकार समोर आल्याने केवळ ट्रस्टची प्रतिमाच डागाळलेली नाही, तर भाविकांमध्येही मोठी नाराजी निर्माण झाली आहे. या प्रकरणाची चौकशी पुढे काय वळण घेते आणि जबाबदारांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.