Ram Mandir employees resign Sarkarnama
देश

Ram Mandir Purification Ritual : राम मंदिरातील देणगी चोरीनंतर ट्रस्टचा मोठा निर्णय; 10 दिवसांचा शुद्धीकरण विधी सुरू

Ram Temple Trust begins a 10-day purification ritual after donation theft controversy : श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणानंतर मंदिर व्यवस्थापनावर विविध स्तरांतून टीका होत असतानाच, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दहा दिवसांचा विशेष प्रायश्चित्त आणि शुद्धीकरण विधी सुरू केला आहे.

Pradeep Pendhare

Ayodhya Ram Temple News : अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणानंतर मंदिर व्यवस्थापनावर विविध स्तरांतून टीका होत असतानाच, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दहा दिवसांचा विशेष प्रायश्चित्त आणि शुद्धीकरण विधी सुरू केला आहे.

चोरीच्या घटनेनंतर देवाकडे क्षमा मागणे आणि मंदिर परिसराचे आध्यात्मिक शुद्धीकरण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे ट्रस्टकडून सांगण्यात आले.

राम मंदिर (Ram Mandir) ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी यांच्या संकल्पनेतून बुधवारी या विधीला प्रारंभ झाला. अयोध्येतील विविध गुरुकुलांमधील विद्यार्थी आणि आचार्य यांच्या सहभागातून विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण केले जात आहे. श्रद्धेनुसार, विष्णूच्या एक हजार नावांचे स्मरण केल्याने सकारात्मकता, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते.

गोविंददेव गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा विशेष विधी मंदिर (Temples) परिसरासह विविध गुरुकुलांमध्ये दहा दिवस चालणार असून दररोज विष्णू सहस्रनामाचे किमान 251 वेळा पठण केले जाणार आहे.

राम मंदिरातील देणगी चोरीच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 13 जून रोजी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. प्राथमिक तपासात मंदिरातील देणगी मोजणी प्रक्रियेशी संबंधित आठ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे तत्कालीन सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला होता.

मंदिर ट्रस्टचे सदस्य दिनेंद्र दास यांनी सांगितले की, रामलल्लाच्या दरबारात घडलेल्या चुका सुधारण्यासाठी विष्णू सहस्रनाम स्तोत्रासह वाल्मीकी रामायणाचेही पठण करण्यात येत आहे.

अयोध्येत काहीतरी चुकीचे घडलेय

काँग्रेसचे उत्तर प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी या विधीवर प्रतिक्रिया देताना, "अयोध्येत काहीतरी चुकीचे घडले आहे, हे आम्ही पूर्वीपासून सांगत होतो. शुद्धी यज्ञामुळे तेच स्पष्ट झाले आहे," अशी टीका केली. तसेच संबंधितांनी आपल्या चुकांचे प्रायश्चित्त करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

तर विधीला फारसे महत्त्व नाही

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक मिश्रा यांनीही प्रतिक्रिया देताना, "देणगीतील अपहार करणारे संबंधित लोक स्वतःहून जबाबदारी स्वीकारून क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत शुद्धीकरण आणि प्रायश्चित्त विधीला फारसे महत्त्व राहणार नाही," असे मत व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT