Basavaraj Bommai
Basavaraj Bommai sarkarnama
देश

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न संपलेला विषय; एक इंचही जमीन देणार नाही : बोम्मईंची मुक्ताफळे

सरकारनामा ब्यूरो

बंगळूर : कर्नाटक (Karnataka)-महाराष्ट्र (Maharashtra) सीमाप्रश्न हा संपलेला विषय आहे. महाराष्ट्रातील राजकारणात ज्यावेळी काहीजण अडचणीत येतात, तेव्हा सीमाप्रश्न हा विषय महाराष्ट्रातील नेते उचलून धरतात. तेथील नेते आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हे प्रकरण पेटते ठेवतात, अशी मुक्ताफळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी उधळली आहेत. (Chief Minister Basavaraj Bommai's controversial statement on Karnataka-Maharashtra border issue)

दरम्यान, बोम्मई यांच्या या वादग्रस्त विधानावर महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. तसेच हा विषय सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे त्यावर संवेदनशीलपणे बोलणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते.

विधानसभेत झालेल्या समाज कल्याण खात्याच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना बोम्मई यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत. मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, ‘सीमाप्रश्नाबाबत यापूर्वीच निर्णय झाला आहे. कर्नाटकाची एक इंचही जमीन महाराष्ट्राला दिली जाणार नाही. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आणि नेते आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी भाषा आणि सीमाप्रश्नासारखा विषय उचलून धरण्यापर्यंत खालच्या पातळीवर उतरतात. हा प्रकार त्यांनी सोडून दिला पाहिजे. कन्नड बहुभाषिक असलेले अनेक भाग महाराष्ट्रात गेले आहेत. तो भाग पुन्हा कर्नाटकाला कसा परत मिळेल, याबाबत आम्हीदेखील विचार करीत आहोत, असे म्हणत कर्नाटकातून सीमाप्रश्नासाठी होणाऱ्या कोल्हेकुईला खतपाणी घातले.

दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या गैरव्यवहाराबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. या प्रकरणी गुलबर्गा येथील भाजप नेत्यांना यापूर्वी अटक केली आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या आंदोलनाला महाराष्ट्राचा नेहमीच पाठिंबा राहील, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानावर टीका करताना कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्माई यांनी, महाराष्ट्र सरकार ज्यावेळी अडचणीत येते. त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नाच उकरून काढला असल्याचा जावईशोध लावला. सीमाप्रश्न विषयात कोणतेही बदल केले जाणार नाहीत. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. महाराष्ट्रालादेखील ते ठाऊक आहे. महाराष्ट्रातील नेत्यांकडे आमची अशी मागणी आहे की, त्यांनी भाषा आणि सीमाप्रश्नाचा विषय आपल्या राजकीय उद्देशासाठी करणे सोडून द्यावे. कर्नाटकाची एक इंचही जमीन देण्याचा प्रश्नच याठिकाणी उद्भवत नाही, असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.

काँग्रेस आमदार प्रियांक खर्गे यांनीदेखील पीएसआय भरती घोटाळा प्रकरणात प्रभावी मंत्र्याचा हात असल्याचा आरोप केला आहे. मात्र या आरोपावर मुख्यमंत्री बोम्मई यांनी भाष्य करणे टाळले. पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर न देताच ते तडक निघून गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT