Narendra Modi | Bhendwal  Sarkarnama
देश

Narendra Modi : PM मोदींचं राजकीय भवितव्य धोक्यात; चंद्राबाबू-नितीश कुमार देणार दणका?

Bhendwal News : वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्त होतील असे सध्यातरी दिसत नाही. भाजपाने वयानुसार निवृत्तीचा नियम केला नाही असा दावाही आता केला जात आहे.

Hrishikesh Nalagune, Rajesh Charpe

Bhendwal News : वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्त होतील असे सध्यातरी दिसत नाही. भाजपाने वयानुसार निवृत्तीचा नियम केला नाही असा दावाही आता केला जात आहे. त्यांच्या निवृत्तीवरून भाजपात दुमत आहे. त्यांची भाजपावर असलेली मजबूत पकड आणि संघाचा पाठिंबा बघता मोदी यांना हटवणे सोपे काम नाही असे सध्याचे चित्र आहे.

असे असले तरी जामोद तालुक्यातील भेंडवळच्या घटमांडणीत मात्र देशाचा राजा संकटात राहील, पक्षाचे काही खासदार व मित्रपक्ष त्यांचा पाठिंबा काढून घेऊ शकतात किंवा राजाच बदलू शकतो असे भाकित वर्तवण्यात आले आहे. गेल्या 350 वर्षांची परंपरा असलेल्या या घटमांडणीला बुलढाणा आणि आजूबाजूच्या भाहात विशेष महत्व आहे.

जळगाव जामोद तालुक्यात सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी भेंडवड गावात रामचंद्र महाराज यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी घडमांडणी करण्याची प्रथा सुरू केली होती. यातून ते वर्षभरात देशात काय काय घडणार याचे भाकित करीत होते. आता रामचंद्र महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज वाघ आणि त्यांचे सहकारी सारंगधर पाटील वाघ यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे.

यावेळी त्यांनी देशात अनेक धक्कादायक घडामोडी घडणार असल्याचे भाकित वर्तविले आहे. यावेळच्या घटामध्ये नैवेद्य शेजारी ठेवलेला पानविड्यातील पान गायब झाले. पान हे गादीचे प्रतिक तर सुपारी राजाचे प्रतिक आहे. गेल्या 45 वर्षात असला प्रकार पाहण्यात आला नसल्याचे सारंगधर महाराज यांनी सांगितले. पान नाही म्हणजे राजाची गादी नाही असे समजले जाते.

राजा नाही असे बरेचदा घडले पण गादी नाही हे गेल्या 45 वर्षात प्रथमच घडले आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधानपद हे संकटात येऊ शकते. त्यांना समर्थन देणारे सहकारी पक्षाचे खासदार त्यांचा पाठिंबा काढू शकतात. देशाचा राजा बदलू शकतो असेही भाकीत सारंगधर महाराज यांनी व्यक्त केले. राजा कायम तणावात राहणार असल्याने देशापुढे बरेच संकटे येणार आहेत. BJP

कित्येक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवटसुद्धा लागण्याची शक्यता आहे. घटामधील नैवेद्यावरील करंजी गायब आहे. करंजी हे आर्थिकतेचे प्रतिक समजले जाते. सध्या बाहेरील आक्रमणाची देशाला भीती आहे. अशा बऱ्याच कारणामुळे पंतप्रधान सातत्याने ताणतणावामध्ये राहणार आहे. एकीकडे त्यांना आपली गादी सांभाळावी लागणार आहे तर दुसरीकडे देश चालवण्याची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती फार भीषण स्वरूपाची राहील असे भवितव्य वर्तवण्यात आले आहे.

अशी केली जाते घटमांडणी :

अक्षय तृतीयेच्या पूर्व संध्येला गावाशेजारी एका शेतामध्ये पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत घट मांडणी केली जाते. शेतात एक गोलाकार रिंगण घालून त्याचे मधोमध एक खड्डा खोदला जातो. त्यामध्ये पाण्याची घागर, करवा आणि नैवेद्य ठेवला जातो. त्याच्या शेजारी पानाचा विडा आणि गोलाकार रिंगणामध्ये १८ प्रकारचे धान्य घटांमध्ये मांडले जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता सूर्योदयापूर्वी पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकाऱ्यांनी घटातील साहित्याचे बारकाईने निरीक्षण करतात. त्यावरून पर्जन्यमान, आरोग्य, पीक परिस्थिती, राजकीय परिस्थिती आदीबद्दल भाकीत वर्तवले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT