Narendra Modi Sarkarnama
देश

Parliament No Confidence Motion : मोदी सरकारविरोधातला अविश्वास प्रस्ताव फेटाळला; काँग्रेसला दणका,अधीर रंजन चौधरींचं निलंबन !

सरकारनामा ब्यूरो

New Delhi : केंद्रातील भाजप सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला. त्यावर गेल्या दोन दिवसांपासून लोकसभेत चर्चा सुरू आहे. मोदी सरकारविरोधात विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेवरील भाषणात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत सरकारची बाजू मांडत विरोधकांना सुनावले.

तर पहिल्या दीड तासांच्या भाषणात मोदींनी मणिपूर हिंसाचाराच्या घटनांबद्दल एक शब्दही न काढल्याने विरोधकांनी सभात्याग केला. मोदींनी अविश्वास प्रस्तावावर बोलताना जवळपास दोन तासाहून अधिक काळ भाषण केले. यानंतर लोकसभा अध्यक्षांनी अविश्वास प्रस्ताव फेटाळला. तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरींचे देखील निलंबन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर अविश्वास प्रस्तावावर मतदान झाले. त्यामुळे या मतदानाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले होते. मात्र, विरोधकांनी पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू असतानाच सभात्याग केला. यामुळे मोदींचे भाषण संपल्यानंतर सभागृहात विरोधक उपस्थित नव्हते. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अविश्वास प्रस्तावावर मतदान घेतले. त्यात सत्ताधारी पक्षांनी अविश्वास प्रस्तावाविरोधात आवाजी मतदान केले. तर विरोधकांनी सभात्याग केल्यामुळे हा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांनी फेटाळला.

लोकसभेत मोदी सरकारची चहुबाजुंनी कोडीं केलेल्या काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी(Adhir Ranjan Chaudhari)यांच्या प्रत्येक आरोपांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चोख हिशेब केला. ज्यांचे स्वत:चे हिशेब बिघडलेले आहेत ते आमचा हिशेब काय मागताहेत, असा बोचणारा सवाल करीत मोदींनी चौधरी यांना चांगलेच फटकारले. काँग्रेसने चौधरी यांचा सतत अपमान केल्याची जाणीव मोदींनी त्यांना करून दिली. गुळाचा गोबर करायचा हे चौधरी यांनी दाखवले, असा तिरकस टोलाही मोदींनी लगावला. मोदींच्या भाषणात काही मिनिटे चौधरीच निशाण्यावर राहिले.

अमित शाहां(Amit Shah)च्या भाषणावेळी अधीर रंजन चौधरींनी आक्षेप घेतला. त्यावर शाह म्हणाले, तुमच्या पक्षाने तुम्हाला बोलू दिले नाही. त्याला आम्ही काही करू शकत नाही. संसदीय कामकाज मंत्री आक्षेप घेणार नाहीत. अध्यक्षांनाही आम्ही विनंती करू. आमच्या पक्षाच्या वेळेतील वेळ आम्ही तुम्हाला देऊ पण आता खाली बसा, हाच धागा पकडत मोदींनी गुरुवारी चौधरी यांना टोला लगावला. काल अमित भाई बोलल्यानंतर आज काँग्रेसने चौधरी यांना बोलण्याची संधी दिली. मात्र, त्यांनी गुळाचा गोबर केला असा हल्लाबोलही मोदींनी यावेळी केला.

नरेंद्र मोदी म्हणाले, आता यांनी त्यांच्या आघाडीचं नाव बदललं आहे. आघाडीला इंडिया आघाडी असं नाव त्यांनी दिलंय. परंतु, ही इंडिया आघाडी नसून घमंडिया आघाडी आहे. तिकडे आता प्रत्येकजण नवरदेव बनू इच्छितो. सगळ्यांनाच पंतप्रधान बनायचं आहे. त्यांनी हा साधा विचार केला नाही की कोणत्या राज्यात कुणाबरोबर तुम्ही कुठे पोहोचला आहात? कुठल्या राज्यात कोणाबरोबर आणि कोणाविरोधात बसला आहात. पश्चिम बंगालमध्ये तुम्ही तृणमूलबरोबर आणि कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधात आहात. तर दिल्लीत एकत्र आहात.

नरेंद्र मोदी म्हणाले, रावणाची लंका हनुमानानं नव्हे तर त्यांच्या (रावण आणि त्याची सेना) गर्वानं जाळली. हे सत्य आहे. जनता भगवान रामाच्या रुपात आहे. त्यामुळेच हे (काँग्रेस) ४०० वरून ४० झाले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT