MP Rita Bahuguna Joshi  Sarkarnama
देश

मुलाच्या तिकीटासाठी खासदारकीचा राजीनामा देण्याची भाजपच्या नेत्याची घोषणा

भाजपमध्ये तिकीट वाटपावरून अनेक नेते नाराज असल्याची चर्चा आहे.

सरकारनामा ब्युरो

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी (UP Election 2022) भाजपमधील अनेक नेत्यांनी पक्षांतर केलं आहे. आणखी काही नेते उड्या मारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता भाजपच्या खासदार रीटा बहुगुणा जोशी (Rita Bahuguna Joshi) याही नाराज असल्याची चर्चा आहे. आपल्या मुलाला तिकीट मिळण्यासाठी त्यांनी फिल्डींग लावली आहे. त्यासाठी त्यांनी आता खासदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

उत्तर प्रदेशात भाजपने (BJP) 107 उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली आहे. इतर उमेदवारांच्या नावांवर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. अजूनही तिकीट वाटपावरून पक्षांतर्गत हेवेदावे सुरू असून त्याचे संकेत रीटा बहुगुणा यांनी मंगळवारी दिले. यापुढे पुन्हा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा त्यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. आता त्या आपल्या मुलगा मयांक जोशीसाठी पक्षाच्या नेत्यांशी तडजोडी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रीटा बहुगुणा जोशी म्हणाल्या, माझ्या मुलाने लखनौ कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून तिकीट मागितले आहे. माझा मुलगा बारा वर्षांपासून राजकारणात आहे. अशा स्थितीत जर त्याने तिकीट मागितले तर तो त्याचा अधिकार आहे. एका कुटुंबात एकच पद अशी पक्षाची भूमिका असेल आणि जर पक्षाने माझ्या मुलाला तिकीट दिले तर मी खासदारकीचा राजीनामा देण्यास तायर आहे. ही बाब पक्षाच्या नेतृत्वालाही सांगितले असल्याचे रीटा बहुगुणा यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजपमधील इतर काही खासदारांनीही आपल्या मुला-मुलींसाठी पक्षाकडे तिकीट मागितले आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र नीरज सिंह यांनीही लखनौ कॅंटोन्मेंट किंवा इतर मतदारसंघातून तिकीटासाठी फिल्डींग लावल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी आपली दोन्ही मुले विकास व पभात यांच्यासाठी तिकीटाची मागणी केली आहे. सलेमपूरचे खासदार रविंद्र कुशवाहा यांनी लहान भाऊ जयनाथ कुशवाहा यांच्यासाठी तर खासदार सत्यदेव पचौरी यांनी मुलगा अनूपसाठी तिकीट मागितले आहे.

दरम्यान, देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांच्या मैदानात उत्तर प्रदेशाच्या रणधुमाळीसाठी भाजपच्या प्रचारतोफा 23 जानेवारीपासून धडाडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) व अन्य नेते जाहीर सभा, प्रचार फेऱ्या, रोड शो अशा विविध मार्गांनी राज्यात तुफानी प्रचार सुरू करणार आहेत. अलीकडेच उत्तर प्रदेशमध्ये काही भाजपच्या मंत्री व आमदारांनी भाजपला रामराम केल्यामुळे बरीच खळबळ उडाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचाराची मुख्य सूत्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याऐवजी आता दिल्लीच्या हाती राहतील हेही यातून स्पष्ट झाले आहे. मोदी व शहांकडे सारी प्रचारसूत्रे असल्याने भाजप ३०० च्या वर जागा नक्की मिळवणार असा विश्वास पक्षाच्या दिल्ली वर्तुळातून व्यक्त होत आहे. त्याच वेळी पंजाब व गोव्यासह अन्य राज्यांच्या प्रचार मोहीमांची काटेकोर आखणीही भाजप नेतृत्वाने केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT