Congress Faces Major Setback After Nomination Rejections ; महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. येत्या 2 डिसेंबरला नगरपंचायत व नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद व महापालिकेच्या निवडणुका होतील. महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांमध्ये स्थानिकच्या निवडणुकांचे वारे वाहत असून काही राज्यांतील निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामध्ये केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा व नगर हवेली आणि दमन व दीवचा समावेश आहे.
केंद्रशासित प्रदेशात बुधवारी स्थानिकच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. मात्र, या निवडणुकीच्या मतदानाआधीच तब्बल 75 टक्के जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामध्ये भाजपने बाजी मारली आहे. ग्राम पंचायत, नगरपंचायत आणि जिल्हा पंचायतीच्या प्रमुख पदांच्या निवडणुकीत भाजपचे 122 पैकी 91 जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणुकीआधीच 75 जागा भाजपच्या पदरात पडल्या आहेत.
'इंडियन एक्सप्रेस'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, भाजपने ही निवडणूक हायजॅक केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या 80 टक्के उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. याविरोधात पक्षात मुंबई हायकोर्टात धाव घेत बाद करण्यात आलेल्या अर्जांना आव्हान दिले आहे. दरम्यान, उर्वरित जागांसाठी बुधवारी निवडणूक पार पडली.
केंद्रशासित प्रदेशातील 48 जिल्हा पंचायतींपैकी भाजपने 35 ठिकाणी बिनविरोध विजय मिळवला आहे. पाच वर्षांपूर्वी भाजपला केवळ नऊ ठिकाणी विजय मिळाला होता. तर 44 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांपैकी तब्बल 30 सरपंच भाजपचे बिनविरोध निवडून आले आहेत. दमन जिल्हा पंचायतीमध्ये 16 पैकी 10 जागा भाजपच्या उमेदवारांनी बिनविरोध जिंकल्या आहेत.
दमन पालिकेत 15 वॉर्डपैकी 12 मध्ये तर 16 ग्रामपंचायतींपैकी 10 मध्ये भाजपचे उमेदवार विजयी म्हणून घोषित करण्यात आले आहेत. दीवमध्येही तीच स्थिती आहे. येथील आठ जिल्हा पंचायतींपैकी पाच ठिकाणी भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी म्हणून घोषित करण्यात आले आहेत. दादरा व नगर हवेली जिल्हा पंचायतीत 26 पैकी 20, 15 नगरपालिका वॉर्डपैकी 14 आणि 26 ग्रामपंचायतींपैकी 18 ठिकाणी भाजपला विजय मिळाला आहे.
भाजपच्या विजयी उमेदवारांना 24 व 25 ऑक्टोबर रोजीच विजयी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. उर्वरित जागांसाठी बुधवारी मतदान झाले. दरम्यान, इंडियन एक्सप्रेसशी बोलताना काँग्रेसचे प्रदेश प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी हे षडयंत्र असल्याचा आरोप केला. पक्षाच्या 80 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाद करणे, हे षडयंत्र असल्याचे त्यांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्हाला सात दिवसांचा कालावधी दिला होता. पहिले दोन दिवस अर्जच उपलब्ध करून देण्यात आले नाहीत. त्यानंतर आम्ही सातत्याने मागणी करत असतानाही त्यांनी आवश्यक कागदपत्रांची यादी दिली नाही. ता. 14 व 15 ऑक्टोबरला आमच्या उमेदवारांना कागदपत्रांची माहिती मिळाली. त्याचप्रमाणे अर्जांच्या पडताळणीचे ठिकाण अचानक बदलले. आमचे उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचल्यानंतर अर्ज बाद ठरविण्यात आल्याचे सांगण्यात आले. भाजपच्या एकाही उमेदवाराचा अर्ज बाद झालेला नाही, असे दावा ठाकरेंनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.