Amit Shah, Capt. Amarinder Singh
Amit Shah, Capt. Amarinder Singh sarkarnama
देश

पंजाबमध्ये कोणती चाल खेळणार? : निकालाआधी अमरिदरसिंग आणि अमित शहांमध्ये खलबते

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणूक (Punjab Assembly election) निकालांच्या आधीच माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिदरसिंग (Capt. Amarinder Singh) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची आज दिल्लीत भेट घेऊन घेतली. 'ही सर्वसामान्य भेट होती,' असे अमरिदरसिंग यांनी सांगून आजच्या दिल्ली दौरयाचे कारण गुलदस्त्यात ठेवले. निकालांनंतरच्या राजकीय घडामोडींबद्दलचा अंदाज वतर्विण्यास आपण काही ज्योतिषी नाही असे त्यांनी सांगितले.

पंजाब विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याआधी कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी अमित शहा यांच्या अनेकदा गाठीभेटी घेतल्या होत्या. मुख्यमंत्रीपद सोडावे लागल्यावर कॉंग्रेसमधून (Congress) बाहेर पडून त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. भाजपच्या (Bjp) सर्वोसर्वा नेतृत्वाच्या सूचनेनुसार शहा यांनी कॅप्टन अमरिंदरसिंग व ज्येष्ठ अकाली नेते सुखदेवसिंग ढिंढसा यांच्यापक्षाबरोबरची युती अंतिम केली. राज्यातील ११७ जागांपैकी भाजपने आजवरच्या सर्वाधिक ६७ जागा लढविल्या आहेत. कॅप्टन अमरिंदरसिंग-भाजप युतीने राज्यात सारा जोर लावला तरी मुख्य लढत कॉंग्रेस व आम आदमी पक्ष यांच्यातच होताना दिसत आहे.

बसपा, अकाली दलासाठी फारशी आशादायक परिस्थिती नसल्याचे वातावरण आहे. यंदा पंजाबात शिरोमणी अकाली दल विरुद्ध रोष आहेच. मात्र, खुद्द कॅप्टन अमरिंदरसिंग व ढिंढसा हेही यंदा 'रेड झोन'मध्ये असल्याचे राजकीय जाणकार सईद अंसारी सांगतात. पंजाबात आम आदमी पक्षाचा जोर दिसत असला तरी अमरिंदरसिंग यांच्याच नेतृत्वाखाली मजबूत झालेले काँग्रेसचे संघटनात्मक जाळे अजूनही कायम असल्याचेही अंसारी यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर अमरिंदरसिंग यांनी दुपारी शहा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याबरोबर खलबते केली. मात्र, पत्रकारांशी बोलताना त्यांनी, आमच्यामध्ये सर्वसामान्य चर्चा झाली. या भेटीचा निवडणुकीशी काही संबंध नाही असा सूर लावला.

अमरिंदरसिंग म्हणाले, की निवडणुकीनंतर राज्यात कोणत्या नव्या राजकीय आघाड्या होतील हे मी सांगू शकत नाही. तशी भविष्यवाणी करण्यास मी ज्योतिषी (पंडित) नाही. निवडणुकीत माझ्या पक्षाने व भाजपने चांगली कामगिरी केली आह. बघूया काय होते.

दरम्यान, उत्तर प्रदेशासह उत्तराखंड, गोवा व मणीपूर या चारही राज्यात भाजपच स्पष्ट बहुमताने पुन्हा सत्ता मिळवेल असा विश्वास सत्तारूढ पक्षातर्फे नुकताच वर्तविण्यात आला. तथापि पंजाबबाबत असा विश्वास व्यक्त करणे टाळून शहा यांनी पंजाबातील संभाव्य पराभवाची अप्रत्यक्ष कबुलीच दिली होती. पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनानंतर भाजप विरूध्दचा रोष कायम आहे. ग्रामीण पंजाबमध्ये याचा थेट फटका भाजपला बसेल हे उघड दिसते. निवडणुक प्रचाराच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पंजाबातील एका उड्डाणपुलावर अडकून पडल्याचे प्रकरण भाजपने तापविले होते. हा पंतप्रधानांच्या हत्येचा कट होता व कॉंग्रेसचे चरनजीत सिंह चन्नी सरकारच त्यासाठी जबाबदार आहे असा थेट आरोप भाजप नेते व केंद्रीय मंत्र्यांनी केला होता.

या प्रचाराचाही पक्षाला निर्णायक लाभ होणार नसल्याचे फीडबॅक पक्षाकडे आले आहेत. संपूर्ण पंजाबमध्ये मोदी सरकारने समाजातील गरीब-शोषित-पीडीत-वंचितांच्या, विशेषत शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणाच्या अनेक योजना राबविल्या त्याचा सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास शहा व पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला होता. मात्र, पंजाबमध्ये सत्तेवर भाजप येणार असे सांगण्याचे त्यांनी कटाक्षाने टाळले. इतिहासात प्रथमच भाजप या राज्यात ६५ पेक्षा जास्त जागावर लढत आहे असे सांगून नड्डा थांबले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT