Champai Soren, CP Radhakrishnan Sarkarnama
देश

Champai Soren News : बिहारमध्ये सात तासांतच शपथविधी; झारखंडमध्ये 20 तास उलटूनही मिळेना मुख्यमंत्री...

Rajanand More

Jharkhand News : झारखंडमधील राजकीय स्थिती राज्यपालांच्या भुमिकेमुळे अधिकच बिकट होत चालली आहे. बिहारमध्ये नितीशकुमारांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचदिवशी सात तासांतच नव्या सरकारचा शपथविधी झाला. पण झारखंडमध्ये जवळपास 20 तास झाले तरी राज्यात सरकार अस्तित्वात आलेले नाही. हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदारांनी चंपाई सोरेन यांना गटनेता करत पाठिंबा असलेल्या आमदारांची यादी राज्यपालांना लगेच सादर केली. पण अजूनही शपथविधीसाठी वेळ देण्यात आलेला नाही. (Champai Soren News)

कथित भूखंड घोटाळा प्रकरणात ईडीने (ED) बुधवारी हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना अटक केली. सोरेन यांना अटक होण्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. त्यानुसार त्यांच्या पक्षाकडूनही नव्या सरकारची तयारी करण्यात आली होती. ईडीने गुरूवारी दिवसभर चौकशी केल्यानंतर सोरेन यांना अटक करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सोरेन यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांच्याकडे राजीनामा सुपुर्द करताच अटक करण्यात आली.

सोरेन यांना अटक करताच त्यांच्या पक्षाच्या 47 आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांना दिले. चंपाई सोरेन यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे करण्यात आले आहे. ते राज्यपालांच्या निमंत्रणाची वाट बघत बसले आहेत. त्यांच्यावर राज्यपालांना पत्र पाठवण्याची वेळ आली. ‘राज्यात 18 तासांपासून सरकार नाही. संभ्रमाचे वातावरण आहे. संविधानिक प्रमुख यानात्याने आम्ही तुम्हाला आवाहन करतो की, नवे लोकप्रिय सरकार आणण्यासाठी तुम्ही लवकर पावले उचलायला हवीत,’ असे सोरेन यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपल्या पाठिशी बहुमत असल्याचे सिध्द करण्यासाठी पाठिंबा दिलेल्या आमदारांना राजभवनात घेऊन जाण्याची तयारीही सोरेन यांनी केली आहे. दरम्यान, या पत्रानंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी चंपाई यांना सायंकाळी साडे पाच वाजता भेटीची वेळ दिली आहे. त्यामुळे आता चंपाई यांचा आजच शपथविधी होणार की राजकीय उलथापालथ होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

बिहार अन् झारखंडमध्ये काय फरक?

बिहारमध्ये सात तासांत शपथविधी होत असताना झारखंडमध्ये का वेळ लावला जात आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. नितीशकुमारांनी (Nitish Kumar) राजीनामा दिल्यानंतर काही वेळातंच त्यांना शपथविधीसाठी राज्यपालांनी निमंत्रित केले होते. झारखंडमध्ये मात्र असे काहीच होताना दिसत नाही. या राज्यातील राजकीय स्थिती पाहता राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, अशीही चर्चा रंगली आहे. झारखंड मुक्ती मोर्चासह काँग्रेसमधील काही आमदार नाराज असल्याची चर्चा असल्याने चंपाई सोरेन यांच्याकडे बहुमत नसल्याची चर्चा आहे. बहुमताची खात्री होईपर्यंत राज्यपाल निर्णय घेणार नाही, असा तर्क लढवला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT