Chandrashekhar Azad Sarkarnama
देश

Chandrashekhar Azad First Reaction After Death Attack : प्राणघातक हल्ल्यानंतर चंद्रशेखर आझाद यांचं मोठं विधान; म्हणाले, '' गोळीबारानंतर हल्लेखोरांची...''

सरकारनामा ब्यूरो

Uttar Pradesh : भीम आर्मीचे संस्थापक व अध्यक्ष चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमध्ये गोळीबार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आझाद यांच्या गाडीवर काही अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारात आझाद जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र,आता या हल्ल्यानंतर आता चंद्रशेखर आझादांनी आपली पहिली प्रतिकिया दिली आहे.

चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad )हे एका कार्यक्रमासाठी सहारनपूरच्या देवबंद येथे पोहोचले होते. ते त्यांच्या फॉर्च्युनर कारने प्रवास करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्या कमरेजवळून एक गोळी चाटून गेली असल्याची माहिती आहे. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्राणघातक हल्ल्यानंतर आता चंद्रशेखर आझाद रावण यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आझाद यांनी काय म्हटले?

उत्तर प्रदेश(Uttar Pradesh)मधील सहारनपूर येथे झालेल्या गोळीबारानंतर चंद्रशेखर आझाद म्हणाले, गोळीबार झाला तेव्हा माझ्यासोबत काहीजण होते. गोळीबारानंतर स्थानिक पोलिसांकडे मदतीसाठी संपर्क साधला. हल्लेखोरांबाबत आता व्यवस्थित आठवत नाही. मात्र, माझ्यासोबत असणारे कार्यकर्ते त्यांना ओळखू शकतील.

गोळीबारानंतर हल्लेखोरांची कार सहारनपूरच्या दिशेने गेली. तर, आमच्या कारने यू-टर्न घेतला. हल्ला झाला तेव्हा माझ्या लहान भावासोबत आम्ही पाचजण कारमध्ये होतो. आमच्यासोबत असणाऱ्या एका डॉक्टर सहकाऱ्याला देखील गोळी लागली असावी असा अंदाज आझाद यांनी व्यक्त केले आहे.

चंद्रशेखर यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या आरोपींच्या गाडीचा नंबर हा हरियाणाचा आहे. त्यामुळे आरोपी हरियाणाचे आहेत की, त्यांनी नंबरप्लेट बदलली होती याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. आरोपींनी चार राऊंड फायरिंग(Firing) केल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात चंद्रशेखर यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या गाडीवर गोळ्या लागल्याच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. संबंधित घटनेनंतर भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील खळबळ उडाली आहे.

कोण आहे चंद्रशेखर रावण?

भीम आर्मी (Bhim Army) या संघटनेचे अध्यक्ष व संस्थापक चंद्रशेखर आझाद उर्फ रावण हे वकील, सामाजिक कार्यकर्ते आहेत. 2015 मध्ये चंद्रशेखर यांनी अनुसूचित जातींच्या तरुणांची ‘भीम आर्मी’ही संघटना स्थापन केली. ही संघटना उत्तरेतील सात राज्यांत सक्रियपणे कार्यरत आहे. चंद्रशेखर हे आंबेडकरवादी विचारांचे पुरस्कर्ते आहेत. सहारनपूरमधील जातीय हिंसाचारानंतर ‘भीम आर्मी’चर्चेत आली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT