CJI N. V. Ramana
CJI N. V. Ramana  File Photo
देश

सरन्यायाधीशांची भाजप सरकारला सोमवारची डेडलाईन!

सरकारनामा ब्युरो

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले होते. या घटनेने संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाच्या तपासावर सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा (CJI N.V.Ramana) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता सरन्यायाधीशांनी या प्रकरणी भाजप सरकारला सोमवारची डेडलाईन दिली आहे.

राज्याबाहेरील उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाच्या तपासावर देखरेख ठेवण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली होती. हे निवृत्त न्यायाधीश दररोज या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीवर देखरेख ठेवतील. या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारला बाजू मांडण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

यावर उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने आज ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी बाजू मांडली. आम्हाला सोमवारपर्यंत मुदत द्या. आम्ही निर्णयापर्यंत पोचलो आहोत, असे साळवे यांनी न्यायालयाला सांगितले. यावर सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने अखेर सरकारला सोमवारपर्यंत मुदत दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 8 नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीवेळी तपासावर नाराजी व्यक्त करीत राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. या प्रकरणाचा निष्पक्ष आणि स्वतंत्रपणे तपास करण्याची आवश्यकता न्यायालयाने बोलून दाखवली होती. यासाठी दुसऱ्या राज्यातील निवृत्त न्यायाधीशांमार्फत या तपासावर दैनंदिन देखरेख ठेवावी, अशीही सूचना न्यायालयाने केली होती. राज्य सरकारने नेमलेल्या न्यायिक आयोगाच्या सदस्याने तपासावर देखरेख ठेवण्यावर कोणताही विश्वास नसल्याचेही न्यायालयाने बोलून दाखवले होते.

लखीमपूर खीरी येथे 3 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना चिरडण्यात आले होते. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्राने (Ashish Mishra) हे कृत्य केले होते. या प्रकरणी आशिषला अटक करण्यात आल्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक झाली आहे. यात आशिष मिश्रासह सुमित जयस्वाल, अंकित दास, लतिफ ऊर्फ काले, शेखर भारती, शिशू पाल, सत्य प्रकाश त्रिपाठी, नंदनसिंह बिश्त, आशिष पांडे, मोहित त्रिवेदी, रांकू राणा, धर्मेंद्र आणि लवकुश राणा यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. लखीमपूर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे 3 ऑक्टोबरला गेले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील 4 शेतकरी आहेत. मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा 3 ऑक्टोबरला तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT