Congress News Sarkarnama
देश

Congress Breaking News : 'काँग्रेसच्या सर्व खासदारांना अपात्र करा,त्यांचं चिन्हही...'; कोर्टात याचिका, काय आहे कारण?

Deepak Kulkarni

New Delhi News : देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. तब्बल 99 जागा मिळवत काँग्रेस इंडिया आघाडीमधला सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, आता खासदार राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील प्रचारावेळी रायबरेली येथील जाहीर सभेत केलेल्या एका घोषणेमुळे काँग्रेस पक्षाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रायबरेली येथे झालेल्या प्रचारसभेत केलेली एक घोषणा प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले तर जुलै महिन्यापासून महिलांच्या बँक खात्यात 8500 रुपये जमा केले जातील.जर सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे ट्रान्सफर होतील, असं त्यांनी म्हटलं होतं. या राहुल गांधी यांच्या घोषणेनं लोकसभेला पूर्ण वारं फिरवलं होतं. पण याच घोषणेमुळेच काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सामाजिक कार्यकर्त्या भारती सिंह यांनी काँग्रेसविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी वकील ओपी सिंह आणि शाश्वत आनंद यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत त्यांनी काँग्रेसच्या खटाखट...खटाखट, ठकाठक...ठकाठक शब्दांवर आक्षेप नोंदवला आहे.

भारती सिंह यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत काँग्रेस पक्षासंबंधी तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत.त्यात पहिली मागणी काँग्रेस पक्षाच्या 99 खासदारांना अपात्र ठरवावं,निवडणूक चिन्ह पंजा जप्त करण्यात यावं आणि तिसरी पण तितकीच महत्त्वाची मागणी अर्थात पक्षाची नोंदणीच रद्द करावी अशी मागणी सिंह यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेद्वारे केली आहे. तसेच या प्रकरणी कारवाईची मागणी करणारे पत्रही निवडणूक आयोगाला लिहिले आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत काँग्रेस (Congress) पक्षाने मतदारांची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचारसभा, रॅलीमध्ये दलित, अल्पसंख्याकांसह गरीब,मागास मतदारांना दरमहा 8500 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या सही असलेल्या वचननाम्यातही मतदारांना मतदानाच्या बदल्यात पैसे मिळण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे याचिका कर्त्यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगालाही पत्र

सामाजिक कार्यकर्ते भारती सिंह यांनी निवडणूक आयोगाला या प्रकरणी कारवाई करण्यासाठी पत्र लिहिले आहे. काँग्रेसकडून लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 121(1)(ए) चे उल्लंघन झाले असून तो गुन्हा असल्याचेही म्हटले आहे.

मात्र, काँग्रेस पक्षावर याप्रकरणी कारवाई न झाल्याने आता आमच्याकडून अलाहाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते ?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारादरम्यानच्या सभांमध्ये मोदी -शाहांवर टीकेची झोड उठवली होती. तसेच त्यांनी भाजपकडून 22 लोकांनाच कोट्यधीश बनवले जात आहे.पण आमच्या सरकारकडून महिलांच्या खात्यावर एक लाख रुपये पाठवले जातील.म्हणजे दर महिन्याला तुमच्या खात्यात 8,500 रुपये जमा केले जातील असे गांधी यांनी म्हटलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT