Rahul Gandhi, Mayawati
Rahul Gandhi, Mayawati Sarkarnama
देश

राहुल गांधींचा गौप्यस्फोट; मायावतींना दिली होती ऑफर पण...

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शनिवारी उत्तर प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीबाबत (Assembly Election) मोठा गौप्यस्फोट केला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला (Congress) केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. तर बहूजन समाज पक्षाला (BSP) एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. निवडणुकीआधी काँग्रेसने बसपासमोर आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता. तसेच बसपाच्या प्रमुख मायावती (Mayawati) यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनण्याची ऑफरही दिली होती, असं राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात सांगितलं.

राहुल गांधी यांच्या हस्ते शनिवारी भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी आणि काँग्रेसचे नेते के. राजू यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे. याबाबत काँग्रेसकडून पहिल्यांदाच मायावती यांच्याशी आघाडीबाबत प्रस्ताव दिल्याचे उघड केलं आहे. मायावती यांच्यावर ईडी (ED), सीबीआयचा (CBI) दबाव होता, असंही राहुल यांनी म्हटलं.

राहुल गांधी म्हणाले, सीबीआय, ईडी आणि पेगॅससच्या माध्यमातून राजकीय व्यवस्थेला नियंत्रित केले जात आहे. आम्ही उत्तर प्रदेशातील निवडणुकीत मायावती यांना आघाडी करण्याचा प्रस्ताव दिला होता. पण त्या आमच्याशी बोलल्याही नाहीत. कांशीराम यांनी मोठ्या कष्टाने दलितांना जागृत केले. त्यांचा आवाज बनले. त्याचा आम्हाला तोटा झाला. पण तो वेगळा मुद्दा आहे. आज मायावती म्हणतात की, त्या आवाजासाठी लढणार नाही. मोकळा रस्ता करून दिला. सीबीआय, ईडी, पेगॅसस हे त्यामागचं कारण आहे, असं सांगत राहुल यांनी अप्रत्यक्षपणे मायावती यांनी भाजपला मदत केल्याचे सांगितलं.

संविधान हे भारताचे शस्त्र आहे. पण देशातील विविध संस्थांशिवाय संविधानाचा काहीच फायदा नाही. आपण संविधानाच्या संरक्षणाच्या गोष्टी करत आहोत. पण संविधानाचे संरक्षण संस्थांच्या माध्यमातूनच केले जाऊ शकते. आज या सगळ्या संस्था आरएसएसच्या ताब्यात आहेत. महात्मा गांधींवर गोळ्या झाडल्या, तेव्हाच संविधानावर आक्रमण सुरू झालं, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

भाजपचा उल्लेख न करता राहुल म्हणाले, काही लोक सकाळपासून रात्रीपर्यंत सत्ता मिळवण्याचाच विचार करत असतात. एखादा प्रेमी ज्याच्यावर प्रेम करतो, त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्याचपध्दतीने मीही आपल्या देशाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. माझ्या देशाने मला खूप प्रेम दिलं आहे. ते माझ्यावर कर्ज आहे. या कर्जाला कसं फेडायचा याचा विचार मी करत असतो. देशाने मला अद्दलही घडवली आहे. देश मला म्हणत आहे की, तू शिक आणि समजून घे, असं म्हणत राहुल यांनी विविध निवडणुकांमध्ये झालेले विजय व पराभवांवरही भाष्य केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT