Rahul Gandhi Bharat Jodo yatra Sarkarnama
देश

Rahul Gandhi : भारत जोडो यात्रा का काढली? राहुल गांधींनी पहिल्यांदाच सांगितलं खरं कारण...

Rajanand More

New Delhi : काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देश पालथा घातला होता. या यात्रेमुळे काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत यशही मिळाल्याचा दावा केला जात आहे. पण ही यात्रा काढण्यामागचा प्रमुख उद्देश राहुल यांनी पहिल्यांदाच सांगितला आहे.

राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी विविध मुद्दयावर चर्चा करताना भारत जोडो यात्रा काढण्यामागचे कारणही सांगितले आहे. या यात्रेमुळे आपल्या राजकीय दृष्टीकोनात पूर्णपणे बदल झाल्याचे ते म्हणाले.

भारतीय राजकारणात लोकांप्रती असलेली प्रेमभावना जागृत करण्याचा या यात्रेचा उद्देश होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारतात आपल्यासाठी लोकांशी संवादाचे सर्व रस्ते बंद झाले होते. संसदेतील भाषण टीव्हीवर दाखवले जात नव्हते. मीडिया आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती. कायदेशीर मदतही मिळत नव्हती, अशी खंत राहुल यांनी व्यक्त केली.

आपण जर मीडिया आणि संस्थात्मक मार्गाने लोकांपर्यंत पोहचू शकत नसू तर थेट लोकांमध्ये जाण्या सर्वात चांगला पर्याय असल्याचे आम्हाला वाटले. त्यामुळे संपूर्ण देशात 4 हजार किलोमीटरची यात्रा करण्याचा निर्णय घेतल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले.

यात्रेदरम्यान सुरूवातीला गुडघ्याचे दुखणे सुरू झाले. पहिल्या तीन-चार दिवसांतच वाटले की, हे आपण काय केले? कारण दरदिवशी सकाळी 10 किलोमीटर चालत होतो. पण जशी यात्रे पुढे गेली, तसे आपल्या कामाच्या पध्दतीतही बदल झाला. यात्रेने राजकीय आणि लोकांप्रतीचा आपला दृष्टीकोन बदलून गेल्याचे राहुल यांनी सांगितले.

राजकारणात प्रेम या शब्दाचा उपयोग होत नसल्याचे सांगताना राहुल म्हणाले, राजकारणात राग, अन्याय, भ्रष्टाचार, द्वेष या गोष्टी प्रमुख असतात. पण भारत जोडो यात्रेने प्रेमाच्या नव्या विचाराला भारतीय राजकारणात जागा दिली. या विचाराने खूप चांगले काम केल्याचा दावाही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT