<div class="paragraphs"><p>Narendra Modi&nbsp;</p></div>

Narendra Modi 

 

Sarkarnama

देश

शेतकऱ्यांना चिरडण्याचं पाप गंगेतील स्नानानं धुवून निघणार नाही!

सरकारनामा ब्युरो

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले होते. या घटनेने संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी नेमलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) हा पूर्वनियोजित कट असल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. यात केंद्रीय मंत्र्याचा मुलगा मुख्य आरोपी असल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप अडचणीत आला आहे. यावरुन काँग्रेससह (Congress) विरोधी पक्षांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

राज्याबाहेरील उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाच्या तपासावर देखरेख ठेवण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली होती. यानुसार पंजाब व हरयाना उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश राकेश कुमार जैन यांची निवड केली होती. ते या प्रकरणाच्या तपासावर दैनंदिन देखरेख ठेवून तपास पारदर्शक, निष्पक्ष आणि योग्य होईल, याची काळजी घेत आहेत. याचबरोबर या तपासासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकात तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश सर्वोच्च न्यायालयाने केला होता. यात एस.बी.शिरोडकर, दिपेंदरसिंह आणि पद्मजा चौहान या तिघांचा समावेश आहे.

आता एसआयटीने हा हिंसाचार पूर्वनियोजित कट असल्याचा निष्कर्ष काढला आहे. केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याच्यावर आता खुनाचे गुन्हे दाखल आहेत. आता हा कट असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हेही दाखल करण्यात येतील. याबाबत एसआयटीने या प्रकरणाच्या सुनावणी असणाऱ्या न्यायाधीशांसमोर अहवाल सादर केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, लखीमपूर खिरीमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या जीपखाली चिरडून झालेले शेतकऱ्यांचे मृत्यू पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे एसआयटीने म्हटले आहे. भारताला कलंकित करणाऱ्या घटनेतील गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे मोदी सरकारने व भाजपाने केलेले पाप गंगेतील स्नानाने धुवून निघणार नाही.

लखीमपूर खीरी येथे 3 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना चिरडण्यात आले होते. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्राने (Ashish Mishra) हे कृत्य केले होते. या प्रकरणी आशिषला अटक करण्यात आल्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक झाली आहे. यात आशिष मिश्रासह सुमित जयस्वाल, अंकित दास, लतिफ ऊर्फ काले, शेखर भारती, शिशू पाल, सत्य प्रकाश त्रिपाठी, नंदनसिंह बिश्त, आशिष पांडे, मोहित त्रिवेदी, रांकू राणा, धर्मेंद्र आणि लवकुश राणा यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. लखीमपूर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे 3 ऑक्टोबरला गेले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यातील 4 शेतकरी होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT