New Delhi : लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्रात तर केवळ १६ जागांवर विजय मिळाल्याने पक्षावर मोठी नामुष्की ओढवली आहे. पक्षातील अनेक नेत्यांकडून ईव्हीएमकडे बोट दाखवले जात असले तरी या पराभवामागची इतर अनेक कारणेही आता समोर येऊ लागली आहे.
काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी दिल्लीत झाली. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह लोकसभेचे अध्यक्ष राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी व इतर वरिष्ठ नेते बैठकीला उपस्थित होते. या बैठकी खर्गेंनी दोन्ही राज्यांतील पराभवामागची दोन प्रमुख कारणे सांगताना नेत्यांचे कानही टोचले आहेत.
बैठकीत बोलताना खर्गे यांनी स्थानिक नेत्यांच्या भूमिकेवर बोट ठेवल्याचे समजते. त्यांनी म्हटले आहे की, सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपआपसांतील एकजुटतेची कमतरता आणि एकमेकांविरोधात भाष्य केल्याने खूप नुकसान होते. जोपर्यंत आपण एकजुटतेने निवडणुकीला सामोरे जात नाही, एकमेकांविरोधातील वक्तव्ये थांबवत नाही, तोपर्यंत आपण विरोधकांचा राजकीय पराभव कसा करू शकतो?
एकप्रकारे खर्गे यांनी नेत्यांमधील गटबाजीवरच बोट ठेवले आहे. हरियाणामध्ये भूपिंदर हुडा आणि कुमारी शैलजा यांच्यातील वाद ऐन निवडणुकीच्या प्रचारादरम्यान समोर आला होता. त्याचाही पक्षाला मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे. तर महाराष्ट्रातही मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेसच्या नेत्यांमध्येही दावे-प्रतिदावे सुरू होते. नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातही कलगीतुरा रंगला होता. त्यामुळेही महाविकास आघाडीची सहानुभूती कमी झाल्याची चर्चा आहे.
काँग्रेसच्या कमकुवत संघटनावर बोलताना खर्गे म्हणाले, अनेक राज्यांमध्ये आपले संघटन अपेक्षेप्रमाणे नाही. संघटन मजबूत असणे आवश्यक आहे. पण याचा अर्थ हा नाही की, निवडणूक असलेल्या राज्यांतील कळीचे मुद्दे विसरून जायचे. त्या राज्यांतील प्रमुख मुद्दे समजून घेत राजकीय रणनीती आखणे आवश्यक आहे. राष्ट्रीय मुद्दे आणि राष्ट्रीय नेत्यांच्या भरवश्यावर तुम्ही कधीपर्यंत राज्यांची निवडणूक लढणार, असा सवाल खर्गेंनी उपस्थित केला.
ईव्हीएमच्या मुद्यावरही खर्गेंनी भाष्य केले. ते म्हणाले, ईव्हीएममुळे निवडणूक प्रक्रियेबाबत साशंकता निर्माण जाली आहे. निवडणूक आयोग एक संविधानिक संस्था आहे. केवळ सहा महिन्यांत लोकसभा आणि विधानसभेचा निकाल बदलतो, हे राजकीय तज्ज्ञांच्या समजण्यापलीकडे आहे. कोणतेही अंकगणित हा निकाल पटवून देण्यात असमर्थ ठरत असल्याचे खर्गे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.