Vande Mataram BJP Congress controversy: काँग्रेस नेते मंत्री प्रियांक खरगे यांनी 'वंदे मातरम्' वरून भाजपवर चांगलीच आगपाखड केली आहे. सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्यापेक्षा भाजप स्वतःला मोठा समजू लागला आहे. काय गायले गेले पाहिजे, हे ठरवणारे हेच लोक होते.
भाजप या सर्वांपेक्षा मोठा आहे का? स्वातंत्र्यलढ्यात भाजपचे योगदान काय आहे? असा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्यपाल उपस्थित असलेल्या कार्यक्रमांना वगळता, राज्य सरकारच्या सरकारी कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताची पहिली दोन कडवीच गायली जाईल, असा कर्नाटक राज्यामधील काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळाने निर्णय जारी केला आहे.
काँग्रेसचे प्रियांक खरगे म्हणाले, “नेताजी सुभाषचंद्र बोस ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी सैन्य उभारत होते, तेव्हा RSS आणि सावरकर काय करत होते? ते अधिकाधिक लोकांनी ब्रिटिश सैन्यात भरती व्हावे, याची खात्री करत होते. ज्या संघटनेचे मार्गदर्शक ब्रिटिशांकडून 60 रुपयांचे पेन्शन घेत होते, त्यांच्याकडून आम्हाला धडे घेण्याची गरज नाही.”
काँग्रेसच्या (Congress) अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (एआयसीसी) कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ची दोन कडवीच गायली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी कार्यक्रमांमध्येही पहिली दोन कडवीच गाण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वातंत्र्यलढ्याच्या काळात ‘वंदे मातरम्’ने देशवासीयांमध्ये राष्ट्रवाद, एकता आणि देशभक्तीची भावना निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘वंदे मातरम्’च्या अधिकृत आवृत्तीसह विविध सरकारी व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्याचे गायन किंवा वादन करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांमध्ये राष्ट्रीय गीताच्या वादन आणि सामूहिक गायनासाठी वेगवेगळ्या प्रसंगांचे निर्धारण केले आहे.
दरम्यान, काँग्रेसने ‘वंदे मातरम्’ची दोनच कडवी गाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वी टीका केली होती. हा निर्णय कायद्याच्या विरोधात असून, मतपेढीला खूश करण्यासाठी घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता. काँग्रेस कार्यकारिणीने संपूर्ण गीताऐवजी दोन कडवी गाण्याचा निर्णय घेणे, हे पक्षाच्या ‘विभाजनवादी इतिहासाचे’ द्योतक असल्याची टीकाही शहा यांनी केली होती.
मंत्री खरगे यांनी, भाजप सरकार देशाचे राबवत असलेल्या परराष्ट्र धोरणावर खोचक टिप्पणी केली. परराष्ट्र धोरण योग्य दिशेने सुरू आहे की नाही, याबाबत मला खात्री नाही. यापूर्वी जेव्हा BRICS बैठक झाली होती, तेव्हा तुम्ही रुपया मजबूत करण्याचे आश्वासन दिले होते.
रुपया जगभरात व्यवहारासाठी वापरली जाणारी चलन बनेल, असे सांगितले होते. मात्र, त्याऐवजी डॉलरचा भाव वाढला आहे आणि रुपया नव्या नीचांकी पातळीवर घसरला आहे. नेहमीप्रमाणे परराष्ट्र मंत्रालय (MEA) आणि पंतप्रधान भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत काय करायचे, याबाबत अनभिज्ञ आहेत, असे मंत्री खरगे यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.