<div class="paragraphs"><p>Corona</p></div>

Corona

 

Sarkarnama

देश

गृह विलगीकरणाबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; नवी नियमावली जाहीर

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona) वाढत्या रुग्णांसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गृह विलगीकरणाची (Home Isolation) नवी नियमावली जाहीर केली आहे. गृह विलगीकरणात कुणी राहावे, काय काळजी घ्यावी, किती दिवस विलगीकरणाता राहावे याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये हे विलगीकरणाचा कालावधी सात दिवसांवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) नियमावलीनुसार यापूर्वी गृह विलगीकरणाचा कालावधी दहा दिवसांचा होता. सलग तीन दिवस ताप नसल्यास दहा दिवसांनंतर हा कालावधी पूर्ण होत होता. आता हा कालावधी सात दिवसांवर आणण्यात आला आहे. सलग तीन दिवस ताप नसल्याने रुग्णांना चाचणी केल्यापासून सात दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर विलगीकरणातून बाहेर येता येईल, असं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तसेच त्यासाठी चाचणी करण्याचीही गरज नसल्याचे मंत्रालयानं म्हटलं आहे.

लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनाही त्यांच्या स्थितीनुसार घरी विलग होण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. श्वास घेण्यास त्रास होत नसेल, ताप नसेल तसेच ऑक्सीजनची पातळी 93 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर गृह विलगीकरणात राहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात राहता येणार नाही, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना कडक निर्बंध लागू केले जाण्याचे संकेत मिळत आहेत. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी तीन दिवसांवर आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने बुधवारी तातडीने बैठक घेत काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती दिली. वाढत्या रुग्णसंख्येबाबत त्यांनी काहीसा दिलासा दिला आहे.

टोपे यांनी सांगितले की, राज्यात दररोज आढळून येत असलेल्या रुग्णांपैकी तब्बल 90 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाही. तसेच उर्वरित रुग्णांपैकीही कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच विलग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागिकांमध्ये कोरोनाची सौम्य किंवा लक्षणे विरहित असल्याचे आढळून येत आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिल्याने दिलासा मिळाला आहे.

राज्यासह देशभरात कोरोना रुग्णांच्या विलगीकरणाबाबतही वेगवेगळे नियम असल्याचे सांगत टोपे यांनी महाराष्ट्रात महत्वाचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. राज्यातील कोरोना रुग्णांचा विलगीकरणाचा कालावधी आता सात दिवसच असणार आहे. कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णांना विलगीकरणातून मुक्त केले जाईल, असंही टोपे यांनी स्पष्ट केले. यापूर्वी विलगीकरणाचा कालावधी 14 दिवसांचा होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT