Sanjay Raut on Delhi elections Sarkarnama
देश

Sanjay Raut: AAP ला सत्तेपासून खाली खेचण्यास काँग्रेस अन् केजरीवालच जबाबदार!

Delhi Assembly Election Analysis:आदर्शवाद, नैतिकता, भ्रष्टाचारमुक्त शासन हे स्वप्न घेऊन केजरीवाल व त्यांचे लोक आधी रस्त्यावर आणि मग राजकारणात उतरले. त्यांचे स्वप्नही शेवटी भ्रष्टाचाराच्या आरोपात गढूळ झाले व आता भाजपने त्या स्वप्नाचा पराभव केला.

Mangesh Mahale

New Delhi:दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला असला तरी आपला सत्तेपासून खाली खेचण्यात काँग्रेसच जबाबदार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तील 'रोखठोक'म्हटलं आहे.

केजरीवाल यांच्या पराभवास जितकी काँग्रेस जबाबदार तितकेच स्वत: केजरीवालही जबाबदार आहेत. पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा त्यांनीही बाळगली, पण ज्या मार्गावरून त्यांनी सुरुवात केली तो मार्गच बदलून ते पुढे निघाले, असे 'रोखठोक'मध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

दिल्लीत आम आदमी पार्टीचा पराभव म्हणजे एका स्वप्नाचे मरण आहे. आदर्शवाद, नैतिकता, भ्रष्टाचारमुक्त शासन हे स्वप्न घेऊन केजरीवाल व त्यांचे लोक आधी रस्त्यावर आणि मग राजकारणात उतरले. त्यांचे स्वप्नही शेवटी भ्रष्टाचाराच्या आरोपात गढूळ झाले व आता भाजपने त्या स्वप्नाचा पराभव केला. यास जबाबदार कोण? असा रोखठोक सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

काँग्रेसने काय केले?

काँग्रेसमुळे ‘आप’ उमेदवारांचा 14 ठिकाणी पराभव झाला. त्यात अरविंद केजरीवाल व मनीष सिसोदिया यांचा समावेश आहे. काँग्रेस एकही जागा जिंकू शकली नाही, पण केजरीवाल यांची सत्ता घालविण्यात काँग्रेसने भूमिका बजावली. हरयाणा, महाराष्ट्र, दिल्लीच्या विजयाने मोदी व त्यांच्या लोकांचे मनोधैर्य, आत्मविश्वास वाढला. मोदी 240 जागांवर लोकसभेत थांबले. त्यानंतर ‘इंडिया’ आघाडीही थांबली. त्यामुळे मोदी ‘340’च्या आवेशात वावरत आहेत.

केजरीवालही जबाबदार

केजरीवाल, ममता बॅनर्जी यांनी स्वतंत्र मार्गाचा पुनरुच्चार केला. इंडिया आघाडीतील घटक पक्षांचा संवाद संपला आहे व काँग्रेसचे नेतृत्व नव्याने संवाद साधण्याच्या मन:स्थितीत नाही. महाराष्ट्र हा ईव्हीएमपेक्षा अहंकार आणि ‘फक्त आम्हीच’ या वृत्तीने गमावला. आता दिल्लीतही तेच घडले. केजरीवाल यांच्या पराभवास जितकी काँग्रेस जबाबदार तितकेच स्वत: केजरीवालही जबाबदार आहेत.

ईव्हीएमची त्यात भूमिका नाही

पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा त्यांनीही बाळगली, पण ज्या मार्गावरून त्यांनी सुरुवात केली तो मार्गच बदलून ते पुढे निघाले. भ्रष्टाचाराविरुद्ध सर्वात मोठा लढा देशाच्या राजधानीत त्यांनी उभारला व अण्णा हजारे त्या लढ्याचे प्रतीक होते. जगाने त्यांची दखल घेतली, पण केजरीवाल यांच्या पराभवाने सगळ्यात जास्त खूश झाले ते अण्णा हजारे. केजरीवाल हे मार्ग चुकले, असे अण्णाही म्हणाले. प्रामाणिकपणाची लढाई त्यामुळे दिल्लीच्या वेशीवरच थांबली. ईव्हीएमची त्यात भूमिका नाही, असे राऊतांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT