Delhi CM Atishi Sarkarnama
देश

 Arvind Kejriwal : ...तोपर्यंत केजरीवालांची खुर्ची रिकामी राहणार! मुख्यमंत्री आतिशी यांची पहिल्याच दिवशी मोठी घोषणा

Rajanand More

New Delhi : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी सोमवारी पदाचा कार्यभार स्वीकारला. पहिल्याच दिवशी त्यांनी मोठी घोषणा केल्याने चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मावळते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची खुर्ची तशीच ठेवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात जामीनावर जेलबाहेर आल्यानंतर दोनच दिवसांत केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनीच भावी मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांच्या नावाची घोषणा केली. नंतर आतिशी यांचा शपथविधी मागील आठवड्यात झाला. पण त्यांनी सोमवारी कार्यभार हाती घेतला.

पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री कार्यालयात वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. आतिशी यांच्या खुर्चीशेजारी आणखी एक खुर्ची लावण्यात आली होती. ही दुसरी खुर्ची अरविंद केजरीवाल यांची आहे. मुख्यमंत्री असताना ते याच खुर्चीवर बसत. ही खुर्ची आतिशी यांच्या खुर्चीशेजारी तशीच ठेवली जाणार आहे.

याबाबत माध्यमांसी बोलताना आतिशी म्हणाल्या, या खुर्चीवर केवळ अरविंद केजरीवाल बसतील. ते पुन्हा दिल्लीचे मुख्यमंत्री बनतील. तोपर्यंत ही खुर्ची मुख्यमंत्री कार्यालयातच राहील, त्यावर कुणीही बसणार नाही, असे आतिशी यांनी स्पष्ट केले.

श्रीराम वनवासाला जाताना भरत यांच्या मनात जी भावना होती, तशीच भावना माझ्याही मनात आहे. भगवान राम आपल्या सर्वांचे आदर्श आहेत. केजरीवालांनी त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत दिल्लीकरांची सेवा केली आणि मर्यादांचे पालन करत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. दिल्लीवाले विधानसभा निवढणुकीत आपला प्रचंड बहुमताने विजयी करत केजरीवालांना सीएम बनवतील. तोपर्यंत ही खुर्ची केजरीवालांची वाट पाहील, अशी भावना आतिशी यांनी व्यक्त केली.

ही तर चमचेगिरी

आतिशी यांच्या या निर्णयावर भाजपन सडकून टीका केली आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले, असे करणे संविधान-नियम आणि मुख्यमंत्री पदाच्या अपमान आहे. मुख्यमंत्र्यांच्या टेबलसमोर दोन खुर्च्या ठेवणे म्हणजे कोणत्या आदर्शाचे पालन नव्हे तर ही चमचेगिरी असल्याची टीका सचदेवा यांनी आतिशींवर केली.

दरम्यान, आतिशी यांचा मावळत्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी ठेवत त्याशेजारी आपल्यासाठी दुसरी खुर्ची लावण्याचा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे. कोणत्याही मुख्यमंत्र्यांकडून आतापर्यंत असा निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे या निर्णयावर चर्चा झडणार, हे निश्चित. पण असे असले तरी या निर्णयाचा दिल्लीकरांना काहीच उपयोग नाही, हेही तितकेच खरे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT