Rajasthan Politics Sarkarnama
देश

Rajasthan Politics : नाराज महाराणीला पर्याय? मुख्यमंत्रिपदासाठी वसुंधरा राजेंना डावलत दिया कुमारींचा चेहरा पुढे ?

Vasundhara Raje Vs Diya Kumari : वसुंधरा राजेंचं राज संपुष्टात येणार?

Chetan Zadpe

Rajasthan News : लोकसभेची सेमिफायनल म्हणून नोव्हेंबर महिन्यात राजस्थानमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीकडे पाहिले जात आहे. या निवडणुकीत भाजपने माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना दूर सारण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून वसुंधरा राजे यांचा विरोधी गट सक्रिय झाला आहे. त्यामुळे वसुंधरा राजे यांना साइडलाइन करण्यात येत आहे. त्यासोबतच येत्या काळात वसुंधरा राजे यांना पर्याय म्हणून खासदार दिया कुमारी यांना राजस्थानच्या राजकारणात सक्रिय केले जात आहे. त्यामुळे येत्या काळात दिया कुमारी यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून समोर आणले जाऊ शकते. त्यामुळे राजस्थान भाजपमध्ये वसुंधरा राजे यांचं राज संपणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमाचे भाजपाच्या खासदार दिया कुमारी आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव अलका गुजर यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यामुळे आता भाजपाकडून या नव्या महिला चेहऱ्यांचे प्रमोशन केले जाण्याची शक्यता आहे. दिया कुमारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयपूरमधील सभेत मोठी जबाबदारी मिळाली होती. या घटनेची राजस्थानमध्ये एकच चर्चा आहे. त्यामुळे भाजपा राजस्थानमध्ये काही नवीन प्रयोग करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. भाजपा विधानसभा निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत असलेल्या खासदारांच्या यादीत दिया कुमारी यांचेही नाव असल्याचे सूत्रांकडून समजते.

गेल्या काही दिवसांपासून वसुंधरा राजे यांना परत राजकारणात सक्रिय केले जाईल असे वाटत होते. मात्र, भाजपाची तयारी पाहता वसुंधरा राजे यांना डावलले जात असल्याचे त्यांच्या समर्थकांच्याही लक्षात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या सभेत त्यांना बोलू दिले नाही. त्यामुळेच आता वसुंधरा राजे शिंदे यांना डावलले जात असून, भाजपाच्या खासदार दिया कुमारी यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आणले जाण्याची शक्यता आहे.

वसुंधरा राजेंविरोधी गट गेल्या साडेचार वर्षांपासून त्यांच्या विरोधात काम करत आहे. त्यामुळे त्यांना काही कार्यक्रमाचे आमंत्रण दिले जात नाही. त्यामुळे वसुंधरा राजे यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. काही दिवसांपूर्वी वसुंधरा राजे यांचे सहकार्य असलेले रोहित शर्मा आणि भाटियांना पक्षातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे वसुंधरा राजे यांच्या समर्थकांत काहीशी नाराजी आहे, त्यातच वसुंधरा राजे यांनी आता सावध भूमिका घेतली आहे.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जयपूर दौऱ्यामुळे राजस्थानमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बुधवारी रात्री दोन वाजेपर्यंत दोन्ही नेत्यांनी जयपूरमध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी बैठक घेऊन निवडणुकीची रणनीती आखली. भाजपाच्या उच्चस्तरीय बैठकीत अमित शाह यांनी खासदार दिया कुमारी यांना सर्व बड्या नेत्यांसमोर स्वतंत्रपणे बोलावून चर्चा केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.

खासदार दिया कुमारी यांनी जयपूरच्या हवामहल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर वसुंधरा राजे यांनाही वेगळे बोलावून त्यांच्याशीही चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. अशा स्थितीत भारतीय जनता पक्ष आगामी निवडणुकीत वसुंधरा राजे यांच्या जागी दिया कुमारी यांना उभे करू शकताे, अशी चर्चा आहे.

त्यांच्याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, खासदार रामचरण बोहरा, चुरूचे खासदार राहुल कासवा, टोंक सवाई माधोपूरचे खासदार सुखबीरसिंह जौनपुरिया, जयपूर ग्रामीणचे खासदार कर्नल राज्यवर्धनसिंह राठोड यांच्यासह एक डझनहून अधिक खासदारांना विधानसभेचे तिकीट देण्याची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT