Narendra Modi News, Uddhav Thackeray News
Narendra Modi News, Uddhav Thackeray News sarkarnama
देश

"युतीसाठी प्रयत्न करा म्हणून ठाकरेंनीच सांगितले होते" : शेवाळेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घेतलेल्या शिवसेनेच्या (Shivsena) १२ खासदारांची भेट घेण्यासाठी आणि उद्या सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासंबंधित सुनावणी आहे. अशा दोन्ही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपण दिल्लीला आलो होतो. आज १२ खासदारांनी महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका घेत आपल्याला पाठिंबा दिला आहे. त्यानुसार आज शिवसेना लोकसभा गट तयार करुन १२ खासदारांचे एक पत्र लोकसभा अध्यक्षांकडे दिले आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माध्यमांसमोर बोलताना दिली.

१२ खासदारांची बैठक संपल्यानंतर महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे आणि १२ खासदार बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच खासदार राहुल शेवाळे यांची शिवसेनेचे गटनेता म्हणून आणि खासदार भावना गवळी यांचा मुख्य प्रतोद म्हणून उल्लेख केला. हे १२ खासदार २० ते २२ लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतात. या सर्व खासदारांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे, त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. या सर्वांनी आज लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र देखील दिले आहे, असे शिंदे म्हणाले.

याचवेळी बोलताना राहुल खासदार शेवाळे यांनी अनेक गौप्यस्फोट केले. भाजपसोबतच्या युतीसाठी आतापर्यंत चारवेळा चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणी झाली होती. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर ठाकरे आणि मोदी या दोघांत दिल्लीत स्वतंत्रपणे चर्चा झाली होती. त्यावेळी ठाकरे यांनी पुन्हा भाजपसोबत जाण्याचे सूतोवाच केले होते. मात्र जून महिन्यात मोदींसोबत बोलणी झाली आणि जुलैमध्ये भाजपाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

याच घटनेवर भाजपाचे पक्षश्रेष्ठी नाराज झाले होते. एकीकडे युतीची बोलणी सुरु असताना दुसरीकडे आमदारांवर कारवाई होत आहे, अशी भूमिका घेतली गेली. नाहीतर तेव्हाच युती झाली असती. कित्येक वेळा स्वतः उद्धव ठाकरेंनी युतीची चर्चा केली. पण रिस्पॉन्स मिळाल नाही. या सर्व गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. एवढेच नाही तर माझ्या परीने मी युतीचा प्रयत्न केला, आता तुम्ही प्रयत्न करा, असेही त्यांनी आम्हाला सांगितले असल्याचा मोठा गौप्यस्फोट शेवाळे यांनी केला.

एकनाथ शिंदे यांचे २० जून रोजी बंड झाल्यानंतर ठाकरे यांनी बोलविलेल्या बैठकीतही अनेक खासदारांनी भाजपसोबत जाण्याचा विचार बोलून दाखवला होता. तेव्हाही ठाकरे यांनी तयारी दाखवली होती. मात्र संजय राऊत आणि विनायक राऊत यांनी त्याविरोधात जाहीरपणे भूमिका घेतली. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत शिवसेना खासदारांना पुन्हा निवडून यायचे असेल तर भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही, असे आम्ही अनेकदा सांगितले.

मी स्वत: चार-पाच खासदारांना भेटलो. फडणवीस आणि शिंदेंना भेटलो. पण ज्या गोष्टींची पूर्तता करायची होती ती केली गेली नाही, निर्णय झाला नाही. त्यामुळे आम्ही भाजपसोबत जाण्याचे ठरविले आहे. तसेच आम्ही एनडीएसोबतच आहोत. शिवसेना एनडीएतून अधिकृतरित्या बाहेर पडल्याचे पत्र नाही. तसेच यूपीएत प्रवेश केल्याचेही शिवसेनेकडे अधिकृत पत्र नसल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT