Duplicate EPIC India एोीकोीलोसो
देश

Election Commission : अधिवेशन सुरू असतानाच निवडणूक आयोग 'एक्स्पोज'; मतदान कार्डांबाबत धक्कादायक माहिती उघड

Duplicate EPIC India : निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ५३ हजार १५० डुप्लिकेट ईपीआयसी मतदान कार्ड होते. त्यापैकी २६ हजार ५७५ ईपीआयसी डिलिट करण्यात आले आहेत.

Rajanand More

Election Commission data : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून सध्या निवडणूक सुधारणांबाबत चर्चा केली जात आहे. विरोधकांकडून भारतीय निवडणूक आयोगावर निवडणुकांमधील कथित घोळावरून जोरदार हल्ला चढविला जात आहे. बोगस मतदार, मतदारयाद्यांमधील घोळ, सरकारधार्जिणे निर्णय असे अनेक आरोप केले जात आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यानही मतदारयाद्यांमधील घोळावर अनेक आरोप होत आहेत. यापार्श्वभूमीवर मतदान कार्डांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार साकेत गोखले यांनी सोशल मीडियात निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीबाबत पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी निवडणूक आयोग एक्स्पोज झाल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रासह देशामध्ये डुप्लिकेट मतदार ओळखपत्र म्हणजेच डुप्लिकेट EPIC किती किती आहेत, याबाबत त्यांनी माहिती अधिकारात विचारणा केली होती. त्यावर आयोगाकडून उत्तर देण्यात आले आहे.

गोखले यांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने दिलेल्या उत्तरानुसार देशात सुमारे ६ लाख ५४ हजार डुप्लिकेट आयडी होते. त्यापैकी काही आयडी डिलिट करण्यात आले असून देशात सध्या तब्बल ३ लाख २६ हजार डुप्लिकेट ओळखपत्र आहेत. यामध्ये महाराष्ट्रासह नुकत्याच एसआयआर प्रक्रिया झालेल्या बिहारचाही समावेश आहे.

बिहारमध्ये अजूनही ११ हजार २९५ डुप्लिकेट आयडी आहेत. आयोगाला मागील सात महिन्यांत देशातील ३.२६ लाख आयडी डिलिट करता आले नाहीत, मग ते मतदारयाद्या शुध्द झाल्याचा दावा कसा करू शकतात, असा सवाल गोखले यांनी विचारला आहे.

महाराष्ट्रात किती?

निवडणूक आयोगाने ४ डिसेंबरला गोखले यांना दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ५३ हजार १५० डुप्लिकेट ईपीआयसी मतदान कार्ड होते. त्यापैकी २६ हजार ५७५ ईपीआयसी डिलिट करण्यात आले आहेत. याचाच अर्थ महाराष्ट्रात अजूनही जवळपास २७ हजार डुप्लिकेट ईपीआयसी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

देशात सर्वाधिक १ लाख ३१ हजार डुप्लिकेट आयडी तमिळनाडूमध्ये होते. त्यापैकी तब्बल ६५ हजार डिलिट करण्यात आले आहेत. त्याखालोखाल कर्नाटकात ८९ हजारपैकी ४४ हजार डिलिट करण्यात आले आहेत. सध्या महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान विरोधकांसह सत्ताधारी पक्षांतील अनेक नेत्यांनी दुबार तसेच बोगस मतदारांवरून जोरदार रान उठविले आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडेही अनेकदा तक्रारी केल्या आहेत. आयोगानेही त्याची दखल घेत महापालिकेच्या मतदारयाद्यांमध्ये सुधारणा करण्याच्या सुचना निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यातच आता डुप्लिकेट ईपीआयसीचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT