Ashish Mishra
Ashish Mishra File Photo
देश

तुरुगांतून सुटल्यानंतर आठवडाभरातच मंत्र्याच्या मुलगा पुन्हा अडचणीत!

सरकारनामा ब्युरो

लखीमपूर खीरी : केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याची मागील आठवड्यात जामिनावर सुटका झाली होती. यानंतर आठवडाभरातच तो पुन्हा अडचणीत आला आहे. आशिषने उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे शेतकऱ्यांना चिरडले होते. त्याच्या विरोधात आता मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने विधिज्ञ प्रशांत भूषण हे मैदानात उतरले आहेत.

आशिषला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. याला आता लखीमपूर खीरीतील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्या मार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यांनी याचिकेत म्हटले आहे की, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश याचिका कायद्याच्या कसोटीवर टिकणारा नाही. उत्तर प्रदेश सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जायला हवे होते. राज्य सरकारने हे पाऊल न उचलल्यामुळे आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागत आहे.

उच्च न्यायालयाने आशिषला जामीन मंजूर केला होता. त्याची तीन लाखांच्या प्रत्येकी दोन जातमुचकल्यांवर सुटका झाली आहे. त्याला शहर सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. सत्र न्यायालयाने दोन वेळा आशिषचा जामीन फेटाळला होता. अखेर उच्च न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला होता. त्याची अखेर मागील आठवड्यात तुरूंगातून सुटका झाली होती. इतर कैद्यांप्रमाणे त्याची पुढील दाराने नव्हे तर मागील दाराने सुटका झाली. सुरक्षेच्या कारणास्तव आशिषला मागील दाराने सोडण्यात आले. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर एसयूव्हीत बसून तो निघून गेला होता.

या प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) हा पूर्वनियोजित कट असल्याचा निष्कर्ष काढला आहे. या प्रकरणात आशिष मिश्रा याच्यावर आधी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. हा कट असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाही दाखल झाला होता. याबाबत एसआयटीने या प्रकरणाची सुनावणी सुरू असलेल्या न्यायालयात अहवाल सादर केला होता. या प्रकरणी एसआयटीने तब्बल 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आशिष मिश्राने 3 ऑक्टोबरला 4 शेतकरी आणि एका पत्रकाराला चिरडले होते. यानंतर झालेल्या हिंसाचारात तीन जण ठार झाले होते. त्यातील दोन भाजपचे कार्यकर्ते होते.

लखीमपूर खीरी येथे गेल्या वर्षी 3 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना चिरडण्यात आले होते. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्राने हे कृत्य केले होते. या प्रकरणी आशिषला अटक करण्यात आल्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. या प्रकरणी 13 जणांना अटक झाली होती. यात आशिष मिश्रासह सुमित जयस्वाल, अंकित दास, लतिफ ऊर्फ काले, शेखर भारती, शिशू पाल, सत्य प्रकाश त्रिपाठी, नंदनसिंह बिश्त, आशिष पांडे, मोहित त्रिवेदी, रांकू राणा, धर्मेंद्र आणि लवकुश राणा यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT