Assembly Session
Assembly Session Sarkarnama
देश

विरोधकांना आणखी एक धक्का! विधानसभा अध्यक्षांकडून पाच आमदारांचे निलंबन

सरकारनामा ब्युरो

अमरावती : विधानसभेच्या अधिवेशनात (Assembly Session) विरोधक सतत आक्रमक होत असल्याने सदस्यांचे निलंबन करावे लागत आहे. विषारी दारूकांड प्रकरणी तेलगू देसम पक्षाच्या (TDP) सदस्यांकडून सरकारला धारेवर धरले जात आहे. या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी होत आहे. त्यावरून सभागृहात आजही गदारोळ झाल्याने पाच आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. कालही सभागृहात गोंधळ घालणाऱ्या चार आमदारांना निलंबित करण्यात आले होते.

आंध्र प्रदेशमध्ये सध्या सत्ताधारी वायएसआर काँग्रेस (YSR Congress) विरुद्ध टीडीपी असा राजकीय संघर्ष सुरू आहे. प्रश्नोत्तराच्या तासात वायएसआर काँग्रेसच्या आमदार विदुदला रजनी या बोलण्यास उठल्या आणि टीडीपीच्या आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. यामुळे विधानसभा अध्यक्ष तम्मिनेनी सीताराम यांनी टीडीपीच्या आमदारांना शांत राहण्यास बजावले. अध्यक्षांनी बजावूनही आमदारांनी गोंधळ कायम ठेवला. यामुळे अखेर पाच आमदारांना निलंबित करण्यात आले. सभागृहाचे कामकाज सुरू असताना टीडीपी सदस्य हे सामूहिकरीत्या भजन म्हणून अडथळा आणत आहेत. याबद्दल मंत्र्यांसह वायएसआर काँग्रेसच्या आमदारांनी टीडीपी सदस्यांवर टीका केली आहे.

विषारू दारूकांड प्रकरणावरून हा संघर्ष विधानसभेत पोहचला आहे. या प्रकरणावरून टीडीपीच्या आमदारांकडून सरकारवर गंभीर आरोप केले जात आहेत. सततच्या गदारोळामुळे मागील आठवड्यात दोन वेळा सदस्यांचे निलंबन करण्यात आले. गदारोळ घालणाऱ्या टीडीपीच्या 5 आमदारांना सुरूवातीला आणि नंतर दोन दिवसांनी टीडीपीच्या 11 आमदारांचे एका दिवसासाठी निलंबन करण्यात आले. यानंतर काल चार आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले होते.

आंध्र प्रदेशच्या (Andra Pradesh) विधिमंडळात मागील आठवड्यात चर्चा सुरू असताना टीडीपीच्या सदस्यांनी कामकाजात गोंधळ घातला होता. त्यांनी अर्थसंकल्पावरील चर्चा रोखून धरली होती. जगनारेड्डीगुडेम येथे विषारी ताडी पिऊन झालेल्या मृत्यूंची चर्चा करण्याचा मागणी त्यांनी लावून धरली होती. यावर आरोग्यमंत्री अल्ला काली कृष्णा श्रीनिवास यांनी निवेदन देण्याची तयारी दर्शवली होती. यावरही टीडीपीच्या आमदारांनी गोंधळ कायम ठेवला होता. त्यांनी अध्यक्ष तम्मिनेनी सीताराम यांच्यासमोर धाव घेतली होती. त्यांनी अर्थसंकल्पाची कागदपत्रे फाड़ून सभागृहात भिरकावली होती. त्यावेळीही काही आमदारांना निलंबित करण्यात आले होते.

SCROLL FOR NEXT