<div class="paragraphs"><p>Goa Congress </p></div>

Goa Congress

 
File Photo
देश

बसमधून 'टू व्हिलर'वर : गोव्यात कॉंग्रेस पक्ष असा झाला रिकामा!

ऋषीकेश नळगुणे

पणजी : काँग्रेसचे (Goa Congress) आमदार आणि कार्यकारी अध्यक्ष अलेक्सिओ रेजिनाल्डो (Congress Aleixo Reginaldo) यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रेजिनाल्ड यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री रवी नाईक (Ravi Naik) यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला १५ दिवसांमध्येच बसलेला हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. रेजिनाल्डो यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षातील आमदारांची संख्या अवघ्या २ वर आली आहे.

पुढील वर्षी गोव्यात विधानसभेची निवडणूक (Goa Assembly Election) होत आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसनेही जोर लावला असला तरी प्रत्यक्षात मागील निवडणुकीएवढी ताकद आता राहिलेली दिसत नाही. मागील निवडणुकीत काँग्रेसला ४० पैकी १७ जागा मिळाल्या होत्या. सर्वाधिक आमदार काँग्रेसचे होते. पण त्रिशंकु स्थितीमध्ये काँग्रेसला चकवा देत भाजपने सत्ता स्थापन केली. हीच काँग्रेसची धुळधाण उडण्याची सुरूवात होती.

भाजपला या निवडणुकीत १३ जागा मिळाल्या होत्या. पण आता हा आकडा वाढला आहे. २०१७ च्या निवडणुकीनंतर लगेचच डॉ. विश्वजित राणे (Dr. Vishwjeet Rane) यांनी काँग्रेसला पहिला धक्का दिला. आमदारकीचा राजीनामा देत ते भाजपमध्ये दाखल झाले. पोटनिवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. सध्या ते आरोग्य मंत्री आहेत. त्यानंतर काही दिवसांत सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. दोघांनी मे २०१९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतही विजय मिळवला.

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का तत्कालीन विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी दिला. जुलै २०१९ मध्ये कवळेकर यांनी त्यांच्यासह १० आमदारांचा गट काँग्रेसमधून बाहेर पडला. कवळेकर यांना देखील मंत्रिमंडळात जागा मिळाली. ते सध्या गोव्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि जेष्ठ नेते लुईजिन्हो फालेरो यांनी देखील राजीनामा देत तृणमूलमध्ये प्रवेश केला. आता एवढे आमदार फुटल्याने काँग्रेसमध्ये सध्या केवळ २ आमदार उरले आहेत. त्यामध्ये विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) आणि प्रतापसिंग राणे (Pratapsinh Rane) यांचा समावेश आहे.

काँग्रेसचे आमदार फोडल्याने भाजपची ताकद वाढली आहे. असे असले तरी काँग्रेससोबत गोवा फॉरवर्ड पक्षाने युती केली आहे. तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने तृणमूल काँग्रेसशी आघाडी केली आहे. हे दोन्ही स्थानिक पक्ष पुर्वी भाजपसोबत होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार आहे. दिल्लीच्या आपनेही राज्याच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही निवडणुकीत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये खरा कस मात्र काँग्रेसचा लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT