Goa Lok Sabha 2024 Result sarkarnama
देश

Goa News : गोव्यात इंडिया आघाडीचा विधानसभेत 30 जागा जिंकण्याचा दावा

Sudesh Mitkar

Pune News :  गोव्यातील जागा जिंकण्यासाठी भाजपने दबावतंत्र आणि मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना अपयश आले. सामान्य जनतेनी पक्षांतर व भ्रष्टाचार करणाऱ्यांना योग्य धडा शिकविला. सरकारच्या भ्रष्टाचाराला कंटाळून काही भाजप नेत्यांनी त्यांच्याविरोधात मतदान केले, हे मान्य न करता भाजप फक्त धर्माला दोष देत आहेत. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला चंगली मते मिळाली आहेत.  त्यामुळे आगामी विधानसभेत इंडीया  आघाडी ३० पेक्षा अधिक जागा जिंकणार असा दावा इंडी आघाडीतील सर्व पक्षाच्या अध्यक्षांनी यावेळी केला.

पणजी येथे इंडिया आघाडी कडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला दक्षिण गोवा नवनिर्वाचित खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष ॲड. अमित पालेकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा, शिवसेना अध्यक्ष जीतेश कामत, आमदार ॲड. कार्लोस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्ता, आमदार वेन्झी व्हिएगश तसेच एम. के. शेख, तुलिओ डिसोझा आदी उपस्थित होते.

केंद्रात तसेच राज्यात भाजपने केलेला दावा फोल ठरल्याने जनतेने त्यांना चांगली चपराक लावली आहे. मतांचे ध्रुवीकरण व धार्मिकतेवरून फूट पाडण्याचा केलेला प्रयत्न असफल झाला. पैशांचे आमिष व दबावतंत्रा न बळी पडता भाजपला जनतेने जागा दाखवून दिली आहे. देशाची घटना व लोकशाही वाचवण्यासाठी इंडीया आघाडी हाच पर्याय असल्याचे ओळखून जनतेने मतदान केले आहे.

लोकांसाठी सर्व विरोधी पक्ष आपले वैयक्तिक व राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र आल्याने मतदारानीही पाठिंबा दिला. देशातील जनता भाजपच्या कार्यपद्धतीला कंटाळली आहे. पैसा व ताकिदीचा वापर करणाऱ्या भाजपचे ४०० जागा पार करण्याचे स्वप्न उधळून लावले आहे. त्यामुळे त्यांचे वर्चस्व कमी होत असल्याचे या निवडणुकीतून दिसून आले आहे, असे मत यावेळी इंडीया  आघाडीच्या अध्यक्षांनी तसेच विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, उपस्थित आमदार व खासदार विरीयातो फर्नांडिस यांनी व्यक्त केले.

आगामी लोकसभेत भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी हाच पर्याय असल्याचे आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले होते. त्यातूनच इंडिया आघाडीची निर्मिती झाली. २०२७ मध्ये ही आघाडी ३० पेक्षा अधिक जागा जिंकेल. भाजप आयटी कक्षाने अयोध्येत त्यांचे उमेदवार पराभूत झाल्याने हिंदूना दोष दिला आहे, तर गोव्यात ते धर्मगुरुंचा हस्तक्षेप असा आरोप केला आहे. भाजप स्वार्थी असून स्वार्थासाठी ते काहीही करू शकतात, असे ॲड. पालेकर म्हणाले.

आघाडीसाठी प्रयत्न बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणूक ही इंिडया आघाडीवर लढविली जाणार आहे. ही जागा आम आदमी पक्षाची होती. सदस्य अपात्र ठरल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे या जागेसाठी आम आदमी पक्षाचाच उमेदवार असेल असे ॲड. पालेकर म्हणाले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनीही यासंदर्भात इंडी आघाडी एकत्रित बसून निर्णय घेईल तरी ही जागा ‘आप’लाच देण्याला त्यांनी दुजोरा दिला. ही आघाडी टिकवून ठेवण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न असेल असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT