HD kumaraswamy On Siddaramaiah  Sarkarnama
देश

Karnataka Sarkar : कुमारस्वामींचा सिद्धरामय्या सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले " काँग्रेस त्या पाच गॅरंटीच्या..."

Rashmi Mane

आनंद सुरवसे

कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपला आसमान दाखवत सत्ता स्थापन केली. यासाठी काँग्रेसने प्रचारात वापरलेला गॅरंटीचा फॉर्म्युला जालीम उपाय ठरला होता. मात्र, आता काँग्रेसच्या या गॅरंटीवर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांनी टीका केली आहे. काँग्रेस गॅरंटीच्या नावाने जनतेच्या पैशाचा गैरवापर करत असून, जनतेला दिलेल्या गॅरंटी पूर्ण करण्यात अपयशी ठरले असल्याची टीका कुमारस्वामी यांनी केली आहे.

कुमार स्वामी म्हणाले, देशात सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मते मिळवण्यासाठी काँग्रेसकडून कर्नाटकप्रमाणे गॅरंटीचा फॉर्म्युला वापरला जात आहे. कुमारस्वामी यांचा 'जेडीएस' हा पक्ष नुकताच 'एनडीए'चा घटक झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये कर्नाटकातील भाजप सरकारच्या काळातील काही योजनांचा उल्लेख करत काँग्रेस सरकारवर टीका केली आहे.

कोणत्या आहेत काँग्रेसच्या 5 गॅरंटी?

काँग्रेसने कर्नाटकमध्ये प्रचारावेळी पाच गॅरंटी लागू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामध्ये गृह ज्योती योजनेतून 200 युनिटपर्यंत मोफत वीज, कुटुंब चालवणाऱ्या प्रमुख महिलांसाठी गृहलक्ष्मी या योजनेतून महिन्याला 2,000 रुपये आर्थिक साहायता करणे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना अन्न भाग्य या योजनेतून 10 किलो मोफत तांदूळ, बेरोजगार पदवीधर युवकांना महिन्याला 3,000 आणि डिप्लोमाधारकांना 1500 रुपये आणि महिलांना मोफत एसटी प्रवास या गॅरंटींचा समावेश आहे. दरम्यान, या गॅरंटी राबवण्यात काँग्रेस सरकार अपयशी ठरले असून, सर्वसामान्य जनतेचा पैसा वाया घालवत असल्याची टीका कुमारस्वामी यांनी केली.

शेतकऱ्यांची फसवणूक -

कर्नाटकमध्ये काँग्रेसने सत्तेत येण्यापूर्वी 5 गॅरंटीसह इतर काही आश्वासने दिली होती. मात्र, कर्नाटकातील काँग्रेस सरकार सर्वसामान्य जनतेच्या नावाने पैशाचा गैरवापर करत आहे. तसेच आताच्या काँग्रेस सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. मागील भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान निधी योजनेअंतर्गत 6000 रुपयांच्या हप्त्यांसह राज्य सरकारच्या वतीने 4000 रुपये अतिरिक्त निधी दिला जात होता. मात्र, काँग्रेसने सत्तेत येताच शेतकऱ्यांना देण्यात येणारी ही आर्थिक निधी योजना रद्द केली असल्याचे उदाहरण कुमारस्वामी यांनी या वेळी दिले. तसेच शेजारच्या तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांना 24 तास अखंड वीजपुरवठा केला जातो, तर कर्नाटकमध्ये काँग्रेसने सलग 5 तास वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सद्यःस्थिती पाहिल्यास राज्यात 2 तासांपेक्षा जास्त सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध नाही, तसेच काही ठिकाणी 2 तासदेखील वीज मिळत नसल्याचा आरोप स्वामी यांनी केला.

गृहज्योती योजना फसवी

काँग्रेसने दिलेल्या 5 गॅरंटीमध्ये गृहज्योती कार्यक्रमांतर्गत 200 युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात 200 युनिट वीज कोणालाच मोफत मिळाली नाही. सरकारने केवळ विविध मार्गदर्शक तत्त्वे, नियम, अटी तयार करून प्रत्येक कुटुंबासाठी ते 50 किंवा 30 युनिट्सपर्यंत वीज मोफत दिली आहे, तर दुसरीकडे, काँग्रेस सरकारने उद्योगांसाठी लागणाऱ्या वीजदरामध्ये वाढ केली आहे. काँग्रेसच्या गृहज्योती योजनेतून राज्यातील महिलांना प्रतिमहिना मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, राज्यातील 30-36 लाखांहून अधिक महिलांना पैसे मिळत नसल्याचाही आरोप कुमारस्वामी यांनी केला आहे.

युवा निती योजनाही फेल

काँग्रेसने कर्नाटकमध्ये पदवीधर युवकांसाठीदेखील युवा निती योजनेअंतर्गत पदवीधर विद्यार्थ्यांना 3000 आणि डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना 1500 रुपये मानधन दिले जाणार होते. मात्र, काँग्रेस सत्तेत आल्यानंतर अद्यापही ही योजना सुरू झालेली नाही. याशिवाय या योजनेतून 20243-24 या वर्षात जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचे सरकारकडून सांगितले जात असल्याचे म्हणत काँग्रेसची ही गॅरंटीदेखील फेल ठरली असल्याची टीका कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केली आहे.

SCROLL FOR NEXT