Ajay Mishra and Amit Shah
Ajay Mishra and Amit Shah Sarkarnama
देश

केंद्रीय मंत्र्यासह उपमुख्यमंत्री अडचणीत! उच्च न्यायालयानं ओढले ताशेरे

सरकारनामा ब्युरो

अलाहाबाद : केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला होता. त्याची पुन्हा लखीमपूर खीरी जिल्हा कारागृहात रवानगी झाली आहे. यानंतर आता या प्रकरणातील चौघांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. याचबरोबर केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्यावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.

उच्च न्यायालयानं लव कुश, अंकित दास, सुमित जयस्वाल आणि शिशुपाल या चौघांचा जामीन फेटाळला. या वेळी उच्च न्यायालयानं केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांना खडे बोल सुनावले. मिश्रा यांनी धमकी दिल्यामुळे हा लखीमपूर खीरीत हिंसाचार घडला, असा ठपका विशेष तपास पथकाने आरोपपत्रात ठेवला आहे. याची गंभीर दखल उच्च न्यायालयानं घेतली. न्यायालय म्हणाले की, राजकारण्यांनी सार्वजनिक जीवनात बोलताना सभ्य भाषेचा वापर करायला हवा. त्यांनी त्यांची प्रतिमा आणि त्यांच्या पदाची प्रतिष्ठा लक्षात घ्यायला हवी. कायदा बनवणारेच कायदे मोडणारे दिसू नयेत.

उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे लखीमपूर खीरी परिसरात शेतकरी आंदोलनामुळं प्रतिबंधात्मक आदेश असतानाही कार्यक्रमाला हजर होते. याबाबतही उच्च न्यायालयानं उपमुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले. न्यायालय म्हणाले की, त्या भागातील प्रतिबंधात्मक आदेशाची माहिती उपमुख्यमंत्र्यांना नव्हती, यावर आमचा विश्वास बसत नाही. असे असतानाही त्यांनी त्या भागातील कुस्ती स्पर्धेला हजेरी लावली होती. या प्रकरणातील आरोप हे प्रभावशाली कुटुंबातील आहेत. ते पुराव्यात छेडछाड करू शकतात. त्यामुळे त्यांचा जामीन फेटाळण्यात येत आहे.

आशिषने लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे शेतकऱ्यांना चिरडले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाने 10 फेब्रुवारीला आशिषची जामिनावर सुटका केली होती. या विरोधात मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. भाजप पुन्हा सत्तेत आला असून, तुम्हाला बघून घेऊ, अशा धमक्या हल्लेखोरांकडून दिल्या जात असल्याची तक्रार न्यायालयात करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवत आशिषचा जामीन रद्द केला. यानंतर 24 एप्रिलला आशिष शरण आला होता आणि त्याची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

लखीमपूर खीरी येथे गेल्या वर्षी 3 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना चिरडण्यात आले होते. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने हे कृत्य केले होते. या प्रकरणी आशिषला अटक करण्यात आल्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. या प्रकरणी 13 जणांना अटक झाली होती. यात आशिष मिश्रासह सुमित जयस्वाल, अंकित दास, लतिफ ऊर्फ काले, शेखर भारती, शिशू पाल, सत्य प्रकाश त्रिपाठी, नंदनसिंह बिश्त, आशिष पांडे, मोहित त्रिवेदी, रांकू राणा, धर्मेंद्र आणि लवकुश राणा यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT