IAS Divya Mittal News : उत्तर प्रदेशामधील प्रशासकीय विभागात भूकंप आला असून, जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत राहिलेल्या IAS अधिकारी दिव्या मित्तल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देवरिया येथे त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली होती. दिव्या मित्तल या 2013 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून, तब्बल 13 वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला आहे.
याबाबत त्यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली असून, सध्या त्यांची भावनिक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. दिव्या मित्तल यांनी IIT दिल्ली आणि IIM बंगळुरू येथे शिक्षण घेतले असून, लंडनमध्ये नोकरी करत होत्या. पण देशापासून दूर असल्याची खंत आणि काहीतरी अपूर्ण असल्याची भावना त्यांना देशात परत आणली आणि त्या प्रशासकीय सेवेत आल्या. दरम्यान, आता दिव्या मित्तल यांनी दिलेल्या राजीनाम्याने खळबळ उडाली आहे.
दिव्या मित्तल यांनी फेसबुक आणि ‘एक्स’वर पोस्टमध्ये आपल्या भावना लिहिल्या आहेत. त्यांनी, "आज, मी स्वेच्छेने प्रशासकीय सेवेतील नोकरीचा राजीनामा देत अविस्मरणीय अशा 13 वर्षांच्या प्रवासाचा शेवट केला आहे. सामान्य परिस्थितीतून मोठे होताना मी एका यशस्वी आयुष्याचे स्वप्न पाहिले होते. त्याप्रमाणे रात्रीचे दिवस आणि दिवसाची रात्र करत आयआयटी दिल्ली आणि आयआयएम बंगळुरूमध्ये शिक्षण घेतले. आणि त्यानंतर लंडनमध्ये नोकरीदेखील लागली.
पण सगळ्या इच्छा पूर्ण होत असतानाही काहीसं अपूर्ण वाटत होतं. मी माझ्या देशात नसल्याची भावना सतत मला अस्वस्थ करत होती. माझं शिक्षण, माझा आत्मविश्वास, जगात कुठेही ताठ मानेने चालण्याची माझी ताकद या सर्वांचे ऋण या मातीचं आहे. तेच ऋण मला फेडायचे होते. मी ज्या भारताचे स्वप्न पाहिलं होतं, तो भारत मला घडवण्यासाठी त्याला लागणाऱ्या विटांवर मला माझ्या हातांचे ठसे पाहायचे होते." म्हणून मी परत आले आणि सुदैवाने आयएएस अधिकारी झाले.
'देवरियाने मला शिकवले...'
आपल्या पोस्टमध्ये दिव्या मित्तल यांनी, "मला खूप काही करण्याची संधी मिळाली आणि मी खूप काही शिकलेदेखील. मला ‘देवरियाने योग्य गोष्टीसाठी उभे राहणे हे पर्याय नसून ते कर्तव्य असल्याचे शिकवले. तर विंध्यवासिनी मातेच्या चरणी बसून मी शिकले की शक्ती पदातून नव्हे, तर तिच्या कृपेने आणि लोकांच्या विश्वासातून येते. सर्वात मोठा धडा हा होता की माझे स्वप्न पूर्ण झाले होते, तर लोकांसाठी पाहिलेल्या स्वप्नांसाठी मला जगायचं होतं. तर ज्यांना पहिल्यांदा जमिनीचा हक्क मिळाला, ज्या अपंग व्यक्तींना सन्मानाने जगण्याची संधी मिळाली आणि ज्याच्या शेताला पाणी मिळाले, त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहून या जीवनातील खरी शांती मिळाली.
"हा माझा मूर्खपणा होता..."
दिव्या मित्तल यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, आपण काहीतरी देण्यासाठी आलो आहोत, हाच माझा विचार मूर्खपणा होता. कारण मी ऋण फेडण्यासाठी आले होते. पण येथे जे मिळाले, त्यामुळे उलट ते ऋण वाढतच गेले. मी थकलेली किंवा खचलेली असतानाही ते माझ्याकडे आत्मविश्वासाने पाहत होते आणि त्यामुळेच मला पुढे जात राहण्याचे धाडस देत होते. मी आज जे काही आहे, याचे श्रेय माझ्या सहकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांनाही जाते, ज्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून काम केले आणि माझ्या पाठीशी उभे राहिले.
"अन् डोळे पाणावले"
दिव्या मित्तल यांनी पोस्टच्या शेवटी, "आज माझे डोळे कृतज्ञतेने पाणावले असून लहुरिया दहच्या डोंगरावरील त्या वृद्ध महिलेचा भावनिक प्रसंग आठवतो. त्या गावात पहिल्यांदा पाणी आल्यानंतर काहीही न बोलता, थरथरत्या हातांनी त्या मातेनं माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिला. आता नक्कीच माझ्याकडे हे पद नसेल, पण तो स्पर्श आयुष्यभर विसरणार नाही," असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.