Galwan Valley Clash
Galwan Valley Clash  Sarkarnama
देश

मोठी बातमी : गल्वान खोऱ्यात चीनचे नऊपट अधिक सैनिक मारले गेले

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : भारत (India) आणि चीनच्या (China) सैन्यात गल्वान खोऱ्यात (Galwan Valley) झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. आता गल्वान खोऱ्यातील संघर्षाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनने गल्वान खोऱ्यातील संघर्षात पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (PLA) केवळ 4 सैनिकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात चीनचे 42 सैनिक या संघर्षात मारले गेल्याचे समोर आले आहे.

गल्वान खोऱ्यातील संघर्षात आपले सैनिक मारले गेल्याचे सुरवातीला चीनने जाहीर केले नव्हते. नंतर केवळ 4 सैनिक मारले गेल्याची कबुली चीनने दिली होती. आता ऑस्ट्रेलियातील 'द क्लॅक्सॉन' या वृत्तपत्राने मोठा गौप्यस्फोट केला आहे. चीनने दावा केल्यापेक्षा नऊपट अधिक सैनिक मारले गेल्याचा दावा वृत्तपत्राने केला आहे. चीनच्या वेबो या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुमारे वर्षभर केलेल्या संशोधनातून संशोधकांच्या चमूने ही बाब समोर आणली आहे. याबाबत सोशल मीडियावर करण्यात आलेल्या अनेक पोस्ट चीन सरकारने काढून टाकल्या होत्या.

वृत्तपत्राने म्हटले आहे की, गल्वान नदी ओलांडताना सुमारे 38 चिनी सैनिकांचा मृत्यू झाला. गल्वानमधील गोठवणाऱ्या थंडीत आणि अंधारात या सैनिकांचा मृत्यू झाला. चीनने चार जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले होते. यात ज्युनिअर सार्जंट वँग झुओरान याचा समावेश होता. या वँगचा नदीत बुडून मृत्यू झाला होता. त्याच्यासोबत आणखी 38 सैनिकांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. या घटनेनंतर सैनिकांचे मृतदेह शिकाउन्हे दफनभूमीत नेण्यात आले. सैन्य अधिकारी आणि सैनिकांना तेथे श्रद्धांजली वाहण्यासाठी नेण्यात आले होते. तेथून नंतर मृतदेह हे त्या मृत सैनिकांच्या मूळगावी पाठवण्यात आले होते. (Galwan Valley Clash)

पूर्व लडाखमध्ये गल्वान खोऱ्यात दोन्ही देशांचे हजारो सैनिक तैनात असून, ते वारंवार आमनेसामने येऊन संघर्ष झाला होता. दोन्ही बाजूच्या सैन्यांमध्ये मारामारीचे प्रकार घडले होते मात्र, गोळीबार झालेला नव्हता. भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत ठरल्याप्रमाणचे 15 जून 2020 रोजी रात्री चीनचे सैन्य गल्वान खोऱ्यातून माघार घेण्याच्या तयारीत होते. त्यावेळी दोन्ही देशांतील सैन्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. याचे पर्यावसान भांडणात झाले. त्यावेळी दोन्ही बाजूंच्या सैन्याने दगड आणि काठ्यांचा वापर केला. दोन्ही देशांच्या सैन्यात तुंबळ धुमश्चकी झाली. अखेर मध्यरात्रीनंतर हे सर्व शांत झाले. यात भारताचे 20 अधिकारी व जवान हुतात्मा झाले तर चीनचेही काही सैनिक मारले गेले होते. महत्वाचे म्हणजे या सर्व भांडणात दोन्ही बाजूंकडून गोळीबार झालेला नव्हता.

गल्वानमध्ये त्यांचे नेमके किती सैनिकी मारले गेले याचा माहिती चीनने सुरवातीला दिली नव्हती. पण नंतर गल्वानमध्ये ठार झालेल्या सैनिकांचा मरणोत्तर गौरव करुन चीनने याची कबुली दिली होती. गल्वानमध्ये ठार झालेल्या 4 सैनिकांचा मरणोत्तर गौरव करण्यात आला होता. भारत आणि चीन सीमेवर सुमारे 45 वर्षांच्या कालावधीनंतर अशा प्रकारची घटना प्रथमच गल्वानमध्ये घडली होती. चीनसोबत झालेल्या संघर्षात एवढ्या वर्षांनंतर प्रथमच भारताने अधिकारी आणि जवान गमावले होते. त्याआधी अरुणाचल प्रदेशमध्ये 1975 साली टुलुंग खिंडीत सीमेवर चीनसोबत झालेल्या संघर्षात चार भारतीय जवान हुतात्मा झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT