Devendra Fadanvis News
Devendra Fadanvis News sarkarnama
देश

Jayant Patil News : 'मुख्यमंत्री पद मिळेल या आशेने कारस्थान करून सरकार पाडले; मात्र, त्यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले'

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar Karnataka Assembly Elections News : राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय डोंबलं करणार? इथे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मिलीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्यांचे काय करायचे ते मी बघतो. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. फडणवीसांच्या टिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी चांगलाच समाचार घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत निपाणी येथे कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (Karnataka Assembly Elections) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तमराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेमध्ये जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले, ''काल परवा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षावर टीका केली. मुख्यमंत्री पद मिळेल या आशेने कारस्थान करून ह्यांनी चांगले काम करणारे मविआ सरकार पाडले. त्यांना मात्र उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागले,'' असा टोला लगावला.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून इथे जे सत्ताधारी आहेत त्यांनी या भागाला विकासापासून वंचित ठेवले. या भागात ना पाणी, ना चांगले रस्ते. उत्तमराव पाटील यांच्याकडे चांगला आराखडा तयार आहे. इथल्या नागरिकांना पाणी मिळावे, रहदारीसाठी रस्ता मिळावा, सर्व सुखसुविधा मिळाव्यात यासाठी त्यांचे व्हिजन आहे. उत्तम पाटील हे निपाणीचे भवितव्य आहेत, असेही पाटील म्हणाले.

या सभेमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले, ''आज देशात वेगळे चित्र आहे. निवडणूक कर्नाटकमधील आहे परंतु संपूर्ण देशाचे चित्र पाहिले तर नवनवीन समस्या दिसत आहेत. देशाच्या सीमेवरील राज्यात शांतता असणे गरजेचे आहे. मणिपूर येथे मागील सहा दिवस संघर्ष सुरु आहे, ज्यात ५४ विद्यार्थी आणि तरूण मृत्यूमुखी पडले. याठिकाणी सत्ता भाजपची आहे.''

''ज्यांच्या हाती देश आहे त्यांना मणिपूरसारखे राज्य सांभाळता येत नाही. तर मतं मागण्यासाठी प्रधानमंत्री कर्नाटकात हिंडत आहेत. ते फिरत असताना काँग्रेस आणि विरोधकांना शिव्या देतात. खरंतर पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या हाती असलेल्या सत्तेचा वापर करून मणिपूर कसे वाचवता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे, पण त्यांचे लक्ष त्याठिकाणी दिसत नाही'' असेही पवार म्हणाले.

''कर्नाटकमध्येही भाजपचे राज्य आहे. खरंतर अनेक ठिकाणी भाजप सत्तेत निवडून आलेला नाही. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार फोडून त्यांनी सत्तांतर केले. मध्य प्रदेश आणि अशी अनेक राज्यं सांगता येतील जिथे धनाचा वापर करून माणसे फोडणे आणि त्यातून सरकार बनवणे ही भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे. त्याला कर्नाटकही अपवाद नाही. म्हणून या देशात पैशाचा वापर करून राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीला खड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आली आहे'', असा हल्लाबोल पवार यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT