KS Eshwarappa and Basavaraj Bommai
KS Eshwarappa and Basavaraj Bommai  Sarkarnama
देश

विरोधकांसमोर मुख्यमंत्री झुकले! अखेर ग्रामविकास मंत्र्यांचा राजीनामा घेणार

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : कंत्राटदार संतोष पाटील (Santosh Patil) आत्महत्या प्रकरणी भाजपच्या (BJP) कर्नाटकातील (Karnataka) सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा (K. S. Eshwarappa) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. विरोधकांकडून दबाव वाढू लागल्याने अखेर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ईश्वरप्पांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ईश्वरप्पा हे सायंकाळी राजीनामा देतील, असे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केले आहे. (Santosh Patil Death Case News)

संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी सरकारवर नामुष्की ओढवली आहे. भाजपचा कार्यकर्ता असलेल्या कंत्राटदाराने सरकारमधील एका मंत्र्यावर आरोप करून आत्महत्या केल्याने भ्रष्टाचाराचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला आहे. सुरवातीला या प्रकरणी सरकारने ईश्वराप्पा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासही नकार दिला होता. अखेर दबाव वाढल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांनी ईश्वरप्पांचा राजीनामा घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. नंतर काही तासांतच ईश्वराप्पांचा राजीनामा घेणार असल्याचे जाहीर करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

बेळगाव येथील संतोष पाटील यांच्या कुटुंबीयांना ईश्वरप्पा यांच्याविरोधात तक्रार केली आहे. त्यानुसार ईश्वरप्पा यांच्यासह आणखी दोघांवर संतोष यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पाटील हे कंत्राटदार होते. तसेच हिंदू युवा वाहिनीचे राष्ट्रीय सचिव आणि भाजपचे कार्यकर्तेही होते. उडपी येथील एका हॉटेलमध्ये 12 एप्रिलला त्यांचा मृतदेह आढळून आला होता. ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मागील काही दिवसांपासून ते बेपत्ता होते.

बेळगावी पोलिसांकडून पाटील यांचा शोध घेतला जात होता. दरम्यानच्या काळात पाटील यांनी त्यांच्या मित्रांना मेसेज केला होता. ईश्वरप्पा हे आपल्या मृत्यूला कारणीभूत असतील, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असं पाटील यांनी म्हटलं होतं. आता त्यांची सुसाईट नोटही पोलिसांना सापडली आहे. तसेच नातेवाईकांनाही तक्रार केल्याने पोलिसांनी ईश्वरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यानंतर ईश्वरप्पा यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. अखेर ईश्वरप्पा यांनी मंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे प्रकरण?

पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. ईश्वरप्पा यांच्या सांगण्यावरून आपल्या गावातील रस्त्याच्या कामासाठी चार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. पण त्यांनी खोटेपणा, भ्रष्टाचार, अनियमितता केली, असं पाटील यांनी म्हटलं होतं. त्यामुळे ईश्वरप्पा यांना आपले बील देण्याचे सुचना द्याव्यात, अशी विनंती पाटील यांनी मोदींना केली होती. केलेल्या कामाचे चार कोटी रुपयांचे बील काढण्यासाठी ईश्वरप्पा यांच्याकडून 40 टक्के कमिशन मागितले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT