Karnataka Congress Sarkarnama
देश

Deputy CM Politics : कर्नाटकात उपमुख्यमंत्रिपदाचं त्रांगडं? एक असताना आणखी दोन नेत्यांची नावं चर्चेत; अंतिम निर्णयाबाबत बड्या नेत्याचं वक्तव्य

Karnataka Deputy CM Posts Politics : कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून 19 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. दरम्यान, आता राज्य सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्रिपदांबाबत चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामा ब्युरो

Karnataka Congress Politics : कर्नाटकातील काँग्रेसचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या सरकारमध्ये मंत्रिपदावरून गेल्या काही दिवसांपासून नाराजी नाट्य सुरू होते. नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी काहींनी लॉबिंग केले होते. तर काहींनी दबाव वाढवला होता. मात्र यानंतर नव्या मंत्रिमंडळात १९ जणांना स्थान देत काहींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिवकुमार यांनी केला. पण आता खातेवाटपाच्या आधीच कर्नाटकात नव्याने उपमुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू झाली आहे. या स्पर्धेत दोन नेत्यांची नावे चर्चेत आहेत.

याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंगळवारी (ता. ११) कुवेंपुनगर येथील गृहकार्यालयात पत्रकारांशी बोलताना भाष्य केले आहे. त्यांनी, मला आणि एम. बी. पाटील यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याबाबत काँग्रेस पक्षात चर्चा झाली आहे, हे खरे आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांड घेणार आहे. योग्य वेळ आणि परिस्थिती निर्माण झाल्यानंतर यावर बोलले जाईल, असे सांगितले आहे.

ते म्हणाले की, पक्षाच्या हिताच्या दृष्टीने उपमुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली होती. मात्र, आपण कोणतीही मागणी केलेली नाही किंवा पक्षावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणणार नाही. पक्षानेच योग्य वेळी नेतृत्वाची दखल घ्यावी, अशी भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी, नुकत्याच मंत्रिमंडळात समाविष्ट झालेल्या १९ मंत्र्यांना येत्या १३ ऑगस्टपर्यंत खातेवाटप पूर्ण होण्याची शक्यता आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी नव्या मंत्र्यांना खाती देण्यात येतील, असे जारकीहोळी यांनी सांगितले.

आपल्या खात्यात बदल करण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आपणही कोणतेही खाते मागितले नसून, सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारीच पुढेही सांभाळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात आवश्यक असलेल्या ठिकाणी पुलांच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच कामे सुरू होतील. खानापूर तसेच उगार खूर्दकडून येण्यासाठी परमानंदवाडी पुलाचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. दुष्काळाबाबत सरकार गंभीर असून, राज्यभर पाहणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात यरगट्टी, सौंदत्ती आणि रामदुर्ग या तीन तालुक्यांची दुष्काळग्रस्त म्हणून नोंद करण्यात आल्याचे जारकीहोळी यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करत, ते आजही आपले नेते आहेत. २०२८ची विधानसभा निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पर्यटनस्थळांच्या विकासासाठी अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजना केल्या जातील. बी. नागेंद्र यांना पुन्हा मंत्रिपद देण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना, लोकायुक्त आणि एसआयटीकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर हायकमांडने विचारपूर्वक त्यांना मंत्रिपद दिले असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळातील उर्वरित एक पद महिलेला दिले जाणार असून, या पदासाठी कोणाची निवड होते हे पाहावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT