Bengaluru, 04 September : पाऊस पडत नसल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. डी. के. शिवकुमार सरकारने शेतकरीहिताचा विचार करून कृत्रिम पाऊस (क्लाऊड सीडिंग) पाडण्यासाठी तब्बल 28 कोटी 25 लाख रुपयांची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे आजपासून या मोहिमेला जलसंपदा मंत्री एन. चेलुवरायस्वामी यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभही केला.
दुष्काळी परिस्थितीचा विचार करून शेजारच्या कर्नाटक सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार असे पाऊल कधी उचलणार, असा सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागणी करूनही कृत्रिम पावसाचा प्रयोग अद्याप राबविला गेला नाही, त्यामुळे महाराष्ट्र सरकार कर्नाटक सरकारप्रमाणे कधी निर्णय घेणार, याकडे बळीराजाचे डोळे लागले आहेत.
पावसाच्या कमतरतेमुळे कर्नाटकात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे आगामी काळात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सप्टेंबर अखेर मॉन्सूनचा कालावधी संपणार आहे, त्यामुळे सप्टेंबरअखेर पाऊस न झाल्यास भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे कर्नाटक सरकारने कृत्रिम पावसाचा निर्णय घेतला आहे, असे जलसंपदा मंत्री एन. चेलुवरायस्वामी यांनी सांगितले.
संभाव्य पाणीटंचाई आणि शेतकरीहिताचा विचार करून कर्नाटक सरकारने कृत्रिम पावसाचा (क्लाऊड सीडिंग) निर्णय घेतला आहे. यापूर्वी राबविलेल्या प्रयोगाला सुमारे ३५ टक्के यश मिळाले होते. या योजनेतून नफा किंवा तोटा काहीही झाला, तरी राज्यातील जनतेच्या हितासाठी हा उपक्रम राबविणे महत्त्वाचे आहे, असेही मंत्री चेलुवरायस्वामी यांनी स्पष्ट केले.
28 कोटींच्या खर्चास मंजुरी
कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी हलक्या वजनाचे विमान वापरण्यात येत आहे. तसेच, या ‘क्लाऊड सीडिंग’साठी सुमारे 28 कोटी 25 लाख रुपये खर्चास प्रशासकीय मंजुरीही देण्यात आली आहे. या प्रयोगाचे काम हवामान बदल व कृत्रिम वर्षा क्षेत्रातील तज्ज्ञ संस्थेला देण्यात आले आहे. क्लाऊड सीडिंगचे काम वैज्ञानिक आणि प्रभावी पद्धतीने पार पाडण्यासाठी कर्नाटक सरकारने दोन स्वतंत्र समित्यांची स्थापना केली आहे.
मागणी करूनही महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष
यंदाच्या पावसाळ्यातील अवघा एक महिना मॉन्सूनचा राहिलेला आहे. मात्र, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अजून एकही मोठा पाऊस झालेला नाही. पाऊस न झाल्याने राज्याच्या काही भागात पाणीटंचाई जाणवू लागली असून ऐन पावसाळ्यात टॅंकर सुरु आहेत.
विशेष म्हणजे मॉन्सूनचा कालावधी कमी राहिल्याने या काळात येणाऱ्या ढगावर फवारणी केली तरच फायदा होणार आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फडणवीस सरकारकडे कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी केली आहे. मात्र, अजूनही सरकारने तसे कोणतेही पाऊल उचलले नाही, त्यामुळे कर्नाटकाने राबविलेल्या कृत्रिम पावसाचा निर्णय कधी होणार, असा सवाल विचारला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.