Kaushal Swaraj Passes Awa Sarkarnama
देश

Kaushal Swaraj Passes Away : सुषमा स्वराज यांच्या पतीचे निधन : प्रख्यात ज्येष्ठ वकील, माजी राज्यपाल म्हणून मिळवली होती ओळख

Kaushal Swaraj Passes Away : दिल्ली भाजपने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून स्वराज कौशल यांच्या निधनाची माहिती दिली.

Rashmi Mane

देशातील प्रख्यात ज्येष्ठ वकील आणि मिझोरमचे माजी राज्यपाल स्वराज कौशल यांचे निधन झाले. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे पती आणि भाजप खासदार बांसुरी स्वराज यांचे वडील असलेल्या स्वराज कौशल यांनी 4 डिसेंबर रोजी वयाच्या 73व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

स्वराज कौशल यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत वकिली क्षेत्रात ठसा उमटवला. सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील म्हणून ते देशभरात ओळखले जात होते. त्यांनी दिल्ली विद्यापीठ आणि पंजाब विद्यापीठात शिक्षण पूर्ण केल्यानंतर वकिली व्यवसायाची सुरुवात केली. त्यांच्या कायदेशीर कौशल्यामुळे आणि तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे ते देशातील अग्रगण्य वकिलांपैकी एक बनले. दिल्ली भाजपने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून त्यांच्या निधनाची माहिती दिल्यानंतर राजकीय आणि कायदेक्षेत्रात दुःखाची भावना व्यक्त होत आहे.

राजकीय क्षेत्रात योगदान

राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातही त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. स्वराज कौशल यांनी सहा वर्षे राज्यसभेचे सदस्य म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांची मिझोरमच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. या पदावर विराजमान झाल्यावर ते देशातील सर्वात तरुण राज्यपाल म्हणून चर्चेत आले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी राज्यातील शांतता प्रक्रियेला चालना देण्यासाठी प्रयत्न केले होते.

सुषमा स्वराज या भारतीय राजकारणातील प्रभावी आणि लोकप्रिय नेत्या होत्या. त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिमा उंचावली. 2019 मध्ये त्यांच्या निधनानंतर स्वराज कौशल यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आपल्या कार्यात सातत्य ठेवले. त्यांच्या कन्या बांसुरी स्वराज या सध्या दिल्लीतील भाजप नेत्या आणि खासदार आहेत.

स्वराज कौशल यांचे योगदान

त्यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे मिजोरममधील शांतता प्रस्थापित करणे. मिजो पीस अ‍ॅकॉर्डमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्या काळात राज्यात सुरू असलेल्या संघर्षाला तोडगा काढण्यासाठी त्यांनी अंडरग्राउंड नेता लालडेंगा यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या प्रयत्नांमुळे दशकांपासून सुरू असलेला संघर्ष संपला आणि मिजोरममध्ये शांततेचा मार्ग मोकळा झाला.

स्वराज कौशल आणि सुषमा स्वराज यांची प्रेमकथा देखील तितकीच रोचक आहे. 1975 च्या आणीबाणीच्या काळात दोघेही तरुण वकील म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांच्या बचाव पथकात काम करत होते. या काळात दोघांची जवळीक वाढली आणि त्यांनी 13 जुलै 1975 रोजी विवाह केला. या विवाहाला जयप्रकाश नारायण यांनीही आशीर्वाद दिला होता. सुषमा स्वराज आपल्या यशाचे श्रेय अनेकदा स्वराज कौशल यांना देत असत. आता ही जोडी पुन्हा एकत्र झाली आहे, पण देशासाठी ही मोठी हानी ठरली आहे.

दिल्ली भाजपने स्वराज कौशल यांच्या निधनाची माहिती देताना सांगितले की, त्यांचे अंतिम संस्कार 4 डिसेंबर रोजी दुपारी 4:30 वाजता लोधी रोड स्मशानभूमीत करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे कायदेक्षेत्रासह राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. देशासाठी कार्य करणारे एक ज्ञानी, शांत आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व हरपल्याचे दुःख अनेकांनी व्यक्त केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT