बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) आता हिजाबवरून (Hijab) वाद पेटला आहे. यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारवर शाळा (Schools) आणि महाविद्यालये (Colleges) काही दिवस बंद ठेवण्याची वेळ आली होती. आता या वादात केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammed Khan) यांनी उडी घेतली आहे. त्यांनी हिजाबबाबत मुस्लिम धर्मातील एक पुरातन गोष्ट सांगितली आहे.
राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी प्रेषित पैगंबरांच्या काळातील हिजाबबाबत एक किस्सा सांगितला आहे. पैगंबरांची नातेवाईक असलेल्या सुंदर मुलीची ही गोष्ट आहे. ते म्हणाले की, पैगबरांची एक सुंदर मुलगी नातेवाईक होती. मी तिचे उदाहरण देतो. ही मुलगी पैगंबरांच्या घरातच वाढली होती. ती पैगंबर यांच्या पत्नीची भाची होती. त्यावेळी त्या मुलीने हिजाब परिधान करण्यास नकार दिला होता. हिजाब न परिधान केल्याबद्दल तिला तत्कालीन गव्हर्नरनी सुनावले होते. त्यावेळी तिने ठाम भूमिका मांडली होती.
हिजाब परिधान न करण्यावर त्या मुलीने म्हटले होते की, मला ईश्वराने सुंदर बनवले आहे. माझ्या सौंदर्यावर सर्वशक्तिमान अशा ईश्वराने मोहोर लावली आहे. यामुळे माझी इच्छा आहे की, सर्वांनी माझी सुंदरता पाहावी. माझ्या सुंदरतेच्या रुपाने ईश्वराची कृपा पाहावी. त्यांनी मला पाहून ईश्वराचे आभार मानावेत. पहिल्या पिढीतील महिलेने अशा प्रकारे भूमिका त्यावेळी घेतली होती. त्यामुळे सगळ्यांनी इतिहास वाचावा, असेही राज्यपालांनी स्पष्ट केले.
हिजाब अन् पगडीची तुलना नको
सर्व विद्यार्थ्यांनी आता पुन्हा त्यांच्या वर्गात जावे, असे मला वाटते. शिखांची पगडी आणि मुस्लिम महिलांचा हिजाब ही तुलना अयोग्य आहे. शिखांना पगडी घालण्याची परवानगी असेल तर मुस्लिम मुलींनी शाळा व महाविद्यालयांत हिजाबची परवानगी द्यावी, ही मागणी अतार्किक आहे. पगडी हा शीख धर्माचा अविभाज्य भाग आहे. याचवेळी कुराणमध्ये महिलांच्या पोशाखासंदर्भात हिजाबचा कोणताही उल्लेख नाही, असे राज्यपालांनी स्पष्ट केले.
अनेक महाविद्यालयांमध्ये बुरखा घातलेल्या विद्यार्थिनी आणि भगव्या रंगाचे उपरणे घेतलेले विद्यार्थी समोरासमोर येऊन वाद होत होते. अनेक महाविद्यालयांमध्ये घोषणाबाजी आणि दगडफेकीचे प्रकार घडले आहेत. यामुळे महाविद्यालयांच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्याठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. हे प्रकरण आता उच्च न्यायालयात गेले आहे. बुरखा वादावर सहा विद्यार्थिनींनी याचिका दाखल केली आहे. वर्गात बुरखा घालण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी विनंती विद्यार्थिनींनी याचिकेद्वारे केली आहे.
शाळा, महाविद्यालये आजपासून पुन्हा सुरू
बुरखा बंदीच्या निर्णयावरून राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, राज्य सरकारचीही डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी राज्यातील शाळा व महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली होती. बोम्मई यांनी आजपासून शाळा व महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली आहे. राज्यातील काही शाळा व महाविद्यालयांमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब (Hijab) घालून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशी बंदी घालणाऱ्या शाळा व महाविद्यालयांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.